---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. १७ डिसेंबर रोजी रात्री पारा ८ अंशांवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे, आगामी २२ डिसेंबरनंतर जिल्ह्याला पुन्हा एका तीव्र थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
१५ डिसेंबर रोजी पारा १२ अंश इतका होता. गेल्या दोन दिवसात तापमानात ४ अंशांची घट होऊन पारा ८ अंशांवर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या तापमानात थोडी वाढ झाली होती, मात्र ताशी १५ किमी वेगाने वाहणाऱ्या बोचऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता अधिकच जाणवत होती. केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसाच्या तापमानातही घट होऊन पारा २७ अंशांपर्यंत खाली आला आहे.
यामुळे दिवसभर हवेत गारठा कायम असून, नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या थंडीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
पुढील आठवडा कसा असेल?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी आठवडाभर किमान तापमान ८ ते १० अंशांच्या दरम्यान कायम राहण्याची शक्यता आहे. २२ डिसेंबरनंतर थंडीची दुसरी लाट येण्याचे संकेत आहे.









