जोशीमठ शहर 12 दिवसांमध्ये 5.4 सेंटीमीटर खचलं, इस्रोच्या..

जोशीमठ : उत्तराखंडमधील जोशीमठमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. दरम्यान, इस्रोच्या एका फोटो रिपोर्टने सगळ्यांचेच टेन्शन वाढवले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) ने जोशीमठची उपग्रह प्रतिमा आणि जमीन कमी झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. उपग्रहाच्या माध्यमातून टीपलेल्या या फोटोमध्ये लगेचच एक महत्त्वाची बाब लक्षात येत आहे, की जोशीमठ जेथे जमीन दर दिवशी सातत्यानं खचत आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये हे शहर जवळपास 5.4 सेंटीमीटर इतक्या प्रमाणात खचलं आहे.

इस्रोने काय म्हटलंय?
इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार 27 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान, जोशीमठ शहर साधारण 5.4 सेंटीमीटर इतक्या प्रमाणात खचलं. एप्रिल 2022 आणि नोव्हेंबर 2022 यादरम्यानच्या काळात जोशीमठ 9 सेंटीमीटरनं खचल्याचं लक्षात आलं. एनएसआरसीच्या सांगण्यानुसार मागील आठवड्यात म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मात्र हे शहर खचण्याचा वेग अतीप्रचंड प्रमाणात वाढला आहे.

उपग्रहांनी टीपलेल्या फोटोंतून ही बाब अगदी स्पष्ट दिसत आहे की, लष्कराचं हवाई तळ आणि नरसिंह मंदिर आणि जोशीमठचा मध्यवर्ती भाग सब्सिडेन्स झोनमध्ये येत आहे. इथं सर्वाधिक जमीन औली रोड (समुद्र सपाटीपासून 2180 मीटर) इथं खचली आहे. इथं सध्या चमोली जिल्हा प्रशासनानं जोशीमठला धोकादायक क्षेत्रामध्ये गणण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इथं शेकडो घरं आणि इमारतींमध्ये मोठमोठ्या भेगा पडल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या इथं स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं आहे. शिवाय त्यांच्या पुनर्विकासासाठी प्रशासनही तयारीला लागलं आहे.

जबाबदार कोण?
निसर्गानं सढळ हस्ते खूप काही या ठिकाणाला दिलं पण सध्या मात्र इथली परिस्थिती विदारक असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. संपूर्ण देशातून जोशीमठसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. स्थानिकांमध्येही प्रचंड भीतीचं वातावरण असून, त्यांनी या परिस्थितीसाठी एनटीपीसी जलविद्युत प्रकल्पांसाठी भुयार खोदण्याच्या निर्णयाला यासाठी दोष देण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे एनटीपीसीकडून मात्र आपल्या प्रकल्पासाठीचं भुयार जोशीमठखालून जात नसल्याचं एका पत्रकातून स्पष्ट केलं आहे.

वैज्ञानिक आणि अभ्यासक काय म्हणताय? 
वैज्ञानिक आणि अभ्यासकांच्या माहितीनुसार हे शहर दरवर्षी 2.5 सेंटीमीटरनं खचत राहील. इथं सध्या सुरू असणारं भूस्खलन पाहता ते रोखणं जवळपास अशक्यच आहे. आतापर्यंत यासाठी जे उपाय करण्यात आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही बांधकामं उध्वस्त करण्यापासून नवं बांधकाम थोपवून धरण्याची पावलं उचलली गेली. पण, तरीही शतकांपासून अस्तित्वास असणाऱ्या या शहरावचं संकट काही केल्या टळलेलं नाही. किंबहुना ते भविष्यात टळेल की नाही याबाबतची कोणतीच शाश्वतीसुद्धा नाही हे दुर्दैव!