लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून अदृश्य फोन ….?

मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या (Jalna lathicharge) घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.  याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी  संवाद साधला. मंत्रालयातून (Ministry)अदृश्य फोन आला अन् मराठा मोर्चावर (Maratha morcha ) लाठीमार (lathi charg) झाला, असं तेथील नागरिकांशी बोलताना लक्षात आल्याचं राऊत म्हणाले.

शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीमार करण्याचं कारण काय? राळेगणसिद्धी गावात अण्णा हजारे जसं मंदिरात आंदोलन करायला बसायचे तसंच जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काही लोक आंदोलनाला बसले होते. परंतु जालन्यात ‘शासन  (Government at your door)आपल्या दारी’ कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागायला नको म्हणून सरकारने आंदोलन मोडून काढलं. त्यासाठी मंत्रालयातून एक अदृश्य फोन गेला. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी, महिला, वृद्धांवर लाठीमार केला. अमानवी पद्धतीने लोकांना मारलं गेलंय, त्यांची डोकी फोडली, लोकांवर गोळ्या चालवल्या गेल्या. एवढं सगळं करण्याचं कारण काय? असा सवाल राऊत यांनी विचारला.

शासनाकडून झालेला लाठीमार यामागे २ कारणं आहेत. शासन वैफल्यग्रस्त आहे. सरकारला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. सरकार मराठा समाजाच्या आंदोलकांना तोंड देऊ शकत नाही. एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला आंदोलकांवर असा लाठीमार करायचा, सरकारची ही कुठली पद्धत? असाही जळजळीत सवाल राऊत यांनी विचारला.

ज्या दिवशी लाठीमार केला गेला, त्यादिवशी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. देशातला आणि महाराष्ट्रातील मीडिया उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी काय बोलतात, याकडे टक लावून बसला होता. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा लाठीमार घडविण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.