जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकाव; ‘सामना’तून काँग्रेसला घरचा आहेर

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या जम्मू-काश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणूकीत एका राज्यात भाजपला तर एकात काँग्रेसला विजय मिळाला. परंतू हरयाणात जेथे काँग्रेससह सर्व पोलपंडितांनी काँग्रेसच विजय होईल असा कौल दिला होता, तेथे भाजपने बहुमत मिळवत सर्वांचेच गणित चुकविले.

हरयाणात पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्ष राजकारणात पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे. यामध्ये आता विरोधकांसोबत काँग्रेसचे मित्रपक्षही त्यांच्यावर ताशेरे ओढू लागले आहे. अश्यातच महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना  ‘उबाठा’ गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला घराचा आहेर दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
“काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू. आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस कमजोर असते, तिथे ते प्रादेशिक पक्षाची मदत घेतात. जिथे काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत, तिथे ते स्थानिक पक्ष, इतरांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरियाणासारख्या निकालात दिसतो. हरियाणाचा पराभव दुर्देवी आहे. यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. देशातील निवडणूक एकत्र लढवावी लागेल. कोणी स्वत:ला छोटा भाऊ, मोठा भाऊ समजू नये. लोकसभेच यश हे इंडिया आघाडीच यश आहे” असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

‘सामना’तूनही काँग्रेसवर टीका
हरयाणा आणि जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजप-काँग्रेससाठी धक्कादायक आहेत. हरयाणात पुन्हा भाजपचे सरकार येईल असे कुणीच ठामपणे म्हणत नव्हते. काँग्रेसचा विजय एकतर्फी होईल असे एकंदरीत वातावरण होते; पण जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर कसे करायचे हे काँग्रेसकडूनच शिकावे लागेल. हरयाणात भाजपविरोधी वातावरण होते. तरीही हरयाणाचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.