शिरपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, याचे संकेत सध्या प्राप्त होऊ लागले आहेत. या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, आधी महापालिका की जिल्हा परिषद, हा पेच कायम असला, तरी पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या निवडणुका २०१७ च्या प्रभागरचनेनुसारच होतील, असेही स्पष्ट होऊ लागले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज आहे. काही ठिकाणी या प्रशासक राजवटीस तीन वर्षे, तर काही संस्थांवर पाच वर्षांपासून प्रशासक आहेत. राज्यातील सुमारे ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. नुकत्याच न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या निवडणुका होण्याचा मार्ग सुकर झाला असला, तरी निवडणुकांचा मुहूर्त अजून निघाला नाही.

राज्य सरकार व निवडणूक आयोग असा पत्रप्रपंच सुरू आहे. या पत्रप्रपंचास नुकतीच गती आली असून, तशा निवडणुकांच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१७ मधील प्रभागरचना महायुतीला पोषक ठरली होती. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुतीने २०२२ मध्ये झालेली प्रभागरचना मोडीत काढत त्यावर स्थगनादेश दिला होता. आता राज्यात महायुतीची सत्ता असल्याने २०१७ मधील प्रभागरचना गृहीत धरूनच या निवडणुका घेतल्या जातील, ही शक्यता जास्त आहे. सध्या राज्यात पक्षफुटीमुळे काही राजकीय पक्षांची वाताहत झाल्यामुळे आगामी निवडणुका नेमक्या कशा होणार? महायुती की महाविकास आघाडी की स्वतंत्र लढणार, हे अद्याप गुलदस्त्यात असून, रखडलेल्या निवडणुकांमुळे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात जि. प., पं. स.च्या निवडणुकांचा धुरळा उडणार?
राज्य पातळीवर सध्या निवडणुकीच्या हालचालींना गती प्राप्त झाली आहे. आधी जिल्हा परिषद की महानगरपालिका, हा पेच अद्याप कायम आहे. पावसाळा आटोपताच दिवाळीनंतर निवडणुकांचा मुहूर्त काढण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यंदा दिवाळी २० ऑक्टोबरला आहे. दिवाळीनंतरच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर दुसन्या टप्प्यात महापालिका व पालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता जास्त आहे. आतापासूनच ग्रामीण भागात इच्छुकांकडून मोर्चेबांधणीही केली जात आहे.