Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

मराठा आरक्षण : मनोज जरांगे हे १६ फेब्रुवारी पासून उपोषणला बसले आहेत. काल त्यांनी आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जरांगे फडणवीस यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यावर निघाले होते.

मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्याची देखील घटना समोर येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनान अलर्ट झालं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची वाहतूक तात्पुरती बंद करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या संपर्कात एसटी प्रशासन असून, वाहतूक सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.