नवी दिल्ली : ‘बम बम भोले’ आणि ‘जय शिव शंकरा’च्या गजरात शनिवार, दि. २९ जून रोजी पहिल्या दिवशी १३ हजार, ८२७ भाविकांनी श्री अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. बाबांच्या दरबारातील वातावरण आनंदाने आणि स्तुतीने भरून गेले. भल्या पहाटे बालटाल आणि पहलगाम मार्गावरून शिवभक्तांचा जत्था पवित्र गुहेकडे रवाना झाला. बालटाल येथून ७ हजार, ५०० भाविकांचा जत्था रवाना झाला. दरम्यान, ४ हजार, २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी २०० लहान-मोठ्या वाहनांतून शनिवारी पहाटे बेस कॅम्प भगवतीनगर जम्मू येथून काश्मीरला रवाना झाली.
जम्मूहून बालटालला निघालेल्या या गटात १ हजार, २६५ पुरुष, ४४८ महिला, १९ मुले, ८७ साधू आणि ३१ साध्वी होत्या. त्याचप्रमाणे, १ हजार, ६७० पुरुष, ३३२ महिला, दोन मुले, १४४ साधू आणि ३१ साध्वी पहलगाम मार्गाने गेले. यात्रेच्या प्रारंभी जुलैपासून पवित्र गुहेतील आरतीचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. शनिवारी सकाळी पवित्र गुहा परिसरात भोलेनाथाची आरती करण्यात आली.
५२ दिवस यात्रा चालणार
अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस आणि इतर निमलष्करी दलांचे हजारो सुरक्षा कर्मचारी येथे तैनात करण्यात आले आहेत. यात्रेच्या ठिकाणी हवाई देखरेखही ठेवली जाणार आहे. ५२ दिवस चालणारी ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. शनिवारी १८८१ यात्रेकरूंची दुसरी तुकडी भगवती नगर बेस कॅम्प येथून चोख सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली.
ओएनजीसीतर्फे १०० खाटांची दोन रुग्णालये
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ओएनजीसीतर्फे अमरनाथ बेस कॅम्पमध्ये १०० खाटांची दोन रुग्णालये उभारली आहेत. यात्रेनंतरही रुग्णालये सुरूच राहणार आहे. शाश्वत आरोग्य सेवेची गरज ओळखून ओएनजीसीने त्यांच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत अनंतनागमधील बालटाल आणि चंदनवारी-पहलगाम येथे कायमस्वरूपी रुग्णालये बांधल्याचे निवेदनात म्हटले आहे.
भाविकांची संख्या वाढणार
बालटाल बेस कॅम्पच्या डोमोल येथून ७ हजार, ५०० पेक्षा अधिक भाविकांची पहिली तुकडी शनिवार, दि. २९ जून रोजी पहाटे ४.१५ वाजता बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी रवाना झाली. उपायुक्त श्यामबीर सिंग यांच्याकडून हिरवा सिग्नल मिळताच बालटाल खोरे ‘बम बम भोले’च्या जयघोषाने भरून गेले. प्रशासकीय व्यवस्थेवर बाबांचे भक्त आनंदी दिसत असून भाविकांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक नोंदणी
गांदरबल जिल्ह्याचे उपायुक्त श्यामबीर सिंह म्हणाले की, “स्थानिक लोक, सरकारी कर्मचारी आणि सुरक्षादलांमुळेच यात्रा यशस्वी होते. यावर्षीही प्रवास चांगला होईल, अशी आशा आहे. लोक आमच्याकडे येत आहेत आणि मला वाटते की, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक नोंदणी झाली आहे. ४ लाख, ५० हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी नोंदणी केली आहे.