खासदार नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका

काँग्रेस पक्षाने मागील ७५ वर्षांपासून सामान्य नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली. त्या शनिवारी महायुतीचे जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ रोड शो दरम्यान बोलत होत्या.

याप्रसंगी उमेदवार रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश‌ उपाध्यक्ष रेखा कुलकर्णी, विधानसभाप्रमुख डॉ. सुनील शिंदे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण औटे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे व कल्याण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, जातीपातीचे राजकारण  काँग्रेस पक्ष एमआयएम हे करत आहेत. पाकिस्तानचे गुणगान करत असतात. यामुळे काँग्रेसला मत देणे म्हणजे पाकिस्तानला मत देण्यासारखे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील विविध घटकांचा विकास केला आहे. यात देशातील तीन कोटी महिलांना घरे, शेतकऱ्यांपासून मजूर, कामगार व महिलांना विकास योजनेचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून नवा आयाम दिला आहे. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तुमचे एक मत द्यावे, असे आवाहन राणा यांनी केले. यावेळी दानवे यांचेही भाषण झाले.