शहरासह जिल्ह्यात अनेक बेकायदा नागरिकांनी जन्म-मृत्यूचे दाखले मिळविले आहेत. अकोला शहरातही असे अनेक घटक आहेत, ज्यांनी असे दाखले प्राप्त केले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ही बाब उघड केल्यावर आता मनपा प्रशासनाने संबंधित नागरिकांना इशारा दिला असून, येथील नायब तहसीलदारांच्या आदेशाने ज्या लोकांनी जन्म मृत्यूचे दाखले प्राप्त केले, ते सरकारने रद्द केले आहेत.
ते दाखले संबंधित नागरिकांनी मनपात जमा करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे. बांगलादेशी तथा रोहिंग्या जमातीच्या अनेक नागरिकांनी येथे विशिष्ट घटकांच्या माध्यमातून जन्म मृत्यूचे दाखले मिळवून ते येथील नागरिक असल्याचे दाखविले आहे. ही बाब सोमय्या यांच्या मोहिमेत उघड झाली आहे.
नायब तहसीलदारांच्या आदेशाद्वारे अकोला महानगरपालिकेतून १ जानेवारी २०२४ ते २१ जानेवारी २०२५ या कालावधीत नागरिकांनी प्राप्त केलेले जन्म-मृत्यूचे दाखले त्वरित महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात जमा करावे, अशी सूचना आज मनपा प्रशासनाने केली आहे.
उपरोक्त कालावधीत प्राप्त करण्यात आलेले जन्म-मृत्यूचे दाखले कोणत्याही कामानिमित्त वापरत असल्याचे आढळून आल्यावर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांचे उशिरा जन्म-मृत्यू नोंदणीचे आदेश रद्द झाले आहेत व त्यांना आदेश प्राप्त करून घ्यायचे असल्यास त्यांनी तहसील कार्यालयांच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागात नमूद दस्तावेज दाखल करून जन्म/मृत्यू नोंदणी आदेश प्राप्त करून घ्यावेत, असेही आवाहन मनपाने केले आहे.