Nepal Bus Accident : वायुसेनेच्या विमानाने मृतदेह नाशिक येथे आणणार

नेपाळ तीर्थयात्रेसाठी निघालेल्या भुसावळ तालुक्यातील वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस शुक्रवार, २३ रोजी नदीत कोसळून २४ जणांचा जागीच मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली असून याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने आज शनिवार २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.

नेपाळमध्ये तीर्थयात्रेसाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील प्रवाशांच्या बसला उत्तर काठमांडूकडे (नेपाळ) जात असताना शुक्रवारी भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस लगतच्या मर्स्यांगडी नदीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत २६ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमधून हे भाविक काठमांडूला चालले होते. पोखरा येथे काही काळ थांबा घेतल्यानंतर ती बस काठमांडूच्या दिशेने निघाली. तनहुन जिल्ह्यात एना पहारा महामार्गावर बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती महामार्गावरून थेट डोंगररांगांमध्ये असलेल्या नदीमध्ये जाऊन कोसळली. या बसमध्ये चालक आणि सहाय्यक चालकासह ४३ प्रवासी होते. मृत्युमुखी पडलेले सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल परिसरातील आहते. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.

मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.