Lok Sabha Elections : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना अधिकार नाहीत, जागावाटपाची चर्चा दिल्लीत : संजय राऊत

Lok Sabha Elections: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष २३ जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला कल्पना दिलेली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या हवाल्याने काँग्रेस पक्ष लोकसभेला २५ जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. ही बातमी कोणी दिली, मला माहिती नाही. काँग्रेस पक्षाने खुशाल महाराष्ट्रात सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवावी. पण कालच आम्ही दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बसलो होतो. हे बहुतेक महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना माहिती नसेल. तेव्हा आमच्यात काय चर्चा झाली, हे आम्हालाच माहिती आहे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी ते,आदित्य ठाकरे आणि मी यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल यांच्याशी तब्बल अर्धा तास महाराष्ट्राबाबत चर्चा केली. त्या बैठकीत काय घडलं, हे आम्हालाच माहिती आहे.

महाराष्ट्रात कोणताही एक नेता नाही, असला तरी त्याला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. निर्णय घेण्यासाठी त्याला दिल्लीत विचारावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत हायकमांडसमोर होईल. आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींना स्पष्ट सांगितलं आहे की, शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवेल. हा शिवसेनेचा गेल्या कित्येक वर्षांपासूनचा आकडा आहे. सोनिया गांधीजी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल या दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी मधूर संबंध आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ते महाविकास आघाडीचे घटक असावेत, असे आम्हाला वाटते. त्याबाबतही दिल्लीत चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्यामुळे जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा केलेली बरी ठरेल. जागावाटप जवळपास ठरलेले आहे. अंतिम जागावाटप आम्ही दोन तासांमध्ये पूर्ण करु, असेही संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटात काय प्रतिक्रिया उमटतात, ते पाहावे लागेल.