---Advertisement---
पालघर : जळगाव जिल्ह्यात सातपुड्याच्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या एका आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार मागील महिन्यात उघड आला होता. चोपडा तालुक्यातील बोरमडी येथे ही घटना घडली होती. असाच एक गंभीर प्रकार पालघर जिल्ह्यात समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे प्रसूती वेदनांनी त्रस्त असलेल्या एका गर्भवती महिलेला प्रथम रुग्णवाहिका मिळाली नाही आणि नंतर वेळेवर उपचार न मिळाल्याने बाळाचा गर्भातच मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाने नवजात बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि ७० किलोमीटर अंतरावरील त्यांचे घर गाठले. या घटनेने आरोग्य विभागातर्फे करण्यात आले सर्व दावे फोल ठरले आहेत.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातून एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. यात एका कुटुंबाने मृत नवजात बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन ७० किलोमीटर प्रवास केला. मोखाडा ब्लॉकमध्ये वास्तव्यास असलेल्या एका गर्भवती रात्री ३ वाजता प्रसूती वेदना जाणवू लागल्या. यावेळी १०८ वर संपर्क साधण्यात आला. मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णवाहिका आली नाही. यावेळी महिलेच्या कुटुंबियांनी तीला खासगी वाहनातून खोडाळा येथील प्राथमिक केंद्रांत दाखल केले.
---Advertisement---
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रांत देखील तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. तिला नाशिक रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, नाशिक रुग्णालयात पोहचण्यापूर्वींच बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाला. यानंतर, नाशिकहून घरी परतण्यासाठी रुग्णवाहिका मिळालेली नसल्याने, प्लास्टिकच्या पिशवीत मृत बाळाला घेऊन त्यांच्या घरी परतावे लागले.
रुग्णवाहिकेची सेवा वेळेवर मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी केला आहे. दरम्यान, पालघर आरोग्य विभागाने दावा केला आहे की गर्भवती महिलेची वेळोवेळी तपासणी करण्यात आली आणि प्रशासनाला गर्भातील बाळाच्या मृत्यूची माहिती होती, परंतु कुटुंबाने नाशिकहून प्लास्टिकच्या पिशवीत मृत बाळ परत आणले हे माहित नव्हते. अशाप्रकारे, आरोग्य विभागाने या प्रकरणात आपली जबाबदारी टाळली आहे.