साडेतीन हजार एकर जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ या  योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ५० पेक्षा जास्त सौर विद्युत ऊर्जिकरण उपकेंद्र होणार आहेत. विद्युत प्रकल्पामध्ये  ७०० मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून त्यासाठी ३ हजार ५६३ एकर गायरान जमीन जिल्हा प्रशासनाला भाडेतत्त्वावर मिळाल्या आहेत.

याबाबत माहिती देताना  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, सुमारे 3563 एकर गायरान जमीन, ज्यावर 700 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असलेले सौर पॅनेल, जळगाव जिल्हा प्रशासनाने एमएसईबी सोलर ऍग्रो पॉवर लिमिटेडला भाडेतत्त्वावर दिले आहेत. सर्व ग्रामपंचायती, वन, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेच्या मेहनतीचे हे फलित आहे. सौरऊर्जा प्रकल्प बसवल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या सिंचन यंत्रणेला वीज देण्यासाठी दिवसा वीज मिळेल. ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळेल. आणि जळगाव जिल्हा राष्ट्रीय पॉवर ग्रीडमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक, नवीकरणीय ऊर्जा जोडेल जे भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि जळगावच्या विकासात योगदान देईल. अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.