Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताने क्षेपणास्त्र हल्ल्यात मुझफ्फराबादसह पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानंतर काही वेळातच, भारत सरकारनेही या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भारताने मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूर येथील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
या हल्ल्यात मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत, इतर दहशतवादी अड्ड्यांवर एकूण १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची पुष्टी झाली आहे. बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे किमान ३० दहशतवादी मारले गेले आहेत. इतर तपशील गोळा केले जात आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. भारताने पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला केला आहे. आता भारतीय लष्करानेही पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हा हल्ला करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला आहे.
पीओकेवरही सर्जिकल स्ट्राईक
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकही केले आहेत. भारताने पीओकेमधील प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. येथे किमान ५ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.