Pachora News : गेल्या अनेक वर्षांपासून वाघ परिवार समाजकारणासाठी राजकारणात सक्रिय आहे. गेल्या 25 वर्षात राष्ट्रवादीच्या चिन्हावर चार विधानसभा निवडणुका लढलो. यावेळी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने नाईलाजाने अपक्ष लढावे लागले. युती सरकारने हाती घेतलेली विकासात्मक धोरणे , लाडकी बहिण योजना यामुळे निकालाचा अंदाज आला व पराभव समोर दिसत असल्याने मी बाजूला झालो.
समाजाची प्रगती व विकास याच धोरणांच्या आधारे आमचे आतापर्यंतचे राजकारण राहत आले असल्याने व राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत दोन गट पडल्याने कार्यकर्तेही संभ्रमात होते.आपण कुठे व कसे राहावे? विरोधात किती दिवस राहायचे ? या विचाराने कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्याची गळ घातली. कार्यकर्त्यांचा आग्रह व विकासाचा ध्यास पूर्णत्वासाठी भाजपात प्रवेश केल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
30 मे रोजी दुपारी दिलीप वाघ यांनी आपल्या निवासस्थानी भाजपा प्रवेशा संदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर काटे, दत्ता बोरसे, रमेश वाणी, कांतीलाल जैन, डॉ शांतीलाल तेली, प्रकाश पाटील, ॲड अविनाश सुतार, सतीश चौधरी, विनय जकातदार, शिवदास पाटील , वासुदेव महाजन , नंदू सोमवंशी , प्रदीप पाटील , भाजपा तालुका अध्यक्ष गोविंद शेलार , अनिल पाटील , विजय पाटील , सनी वाघ , प्रताप चौधरी , अरुण पाटील , किशोर संचेती , रणजीत पाटील ‘ भगवान मिस्तरी , सुनील पाटील , प्रा.माणिक पाटील , राजेंद्र पाटील , अरुण पाटील , अनिल पाटील , सुदाम वाघ, भागवत मालपुरे आदि उपस्थित होते. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मुंबई येथील प्रवेश सोहळ्याबाबत माहिती दिली.
यावेळी बोलताना मा. आमदार दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले की , बाजार समिती , नगरपालिका , शेतकरी संघ , पीटीसी शिक्षण संस्था ,राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व संचालकांसह वाघ परिवाराचे समर्थक , हितचिंतक अशा सुमारे 200 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होतो.
चार निवडणुका लढलो. यावेळी अपक्ष म्हणून उमेदवारी केली . परंतु निवडणूक रिंगणात असताना वेगवेगळे संकेत मिळाले त्यामुळे बाजूला झालो . आमदार व नगराध्यक्ष म्हणून शहरासह मतदारसंघाचा गतकाळात प्रचंड विकास केला. विकासाचा ध्यास हेच आमच्या राजकारणाचे सूत्र आहे. परंतु सत्तेपासून दूर राहावे लागल्याने विकास व निधी यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या. कार्यकर्तेही सैरभैर झाले होते.
भाजपाकडून प्रवेशा संदर्भात असलेली आग्रही मागणी विचारात घेऊन कार्यकर्त्यांनी भाजपात जाण्याची गळ घातल्याने भाजपात प्रवेश केला आहे .येत्या काळात जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका , शेतकी संघ आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून या निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशाप्रमाणे एक दिलाने काम करून भाजपाचा एकतर्फी प्रभाव सिद्ध करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
येणाऱ्या निवडणुकांत संपूर्ण ताकदीनिशी लढून क्रमांक एक ची भाजपची सत्ता मिळविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. विनय जकातदार , मधुकर काटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी पत्रकारांच्या आगामी निवडणुका व लढत या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप वाघ यांनी स्पष्ट केले की भाजप हा केंद्रापासून राज्यापर्यंत राज्यापासून ते गल्लीपर्यंत सत्ताधारी पक्ष आहे आणि यामध्ये पक्षश्रेष्ठींचे कोणतेही निर्णय हे महत्त्वाचे असतात पक्षाकडून जो आदेश प्राप्त होईल तो आदेश आम्ही मान्य करू तशा पद्धतीने निवडणुका लढवू अमोल शिंदे यांच्या सक्रिय सहभागासंदर्भात दिलीप यांनी स्पष्ट केले की माझ्या प्रवेशाने कोणीही नाराज नाहीत आणि मी भाजपा सक्रिय झाल्यापासून भाजपच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून ते ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसमवेत काम करणार आहे.त्यामुळे कोणी नाराज राहील असे मला वाटत नाही असेही प्रामुख्याने पत्रकार परिषदेचा समारोप करताना त्यांनी सांगितले. आभार नंदू सोमवंशी यांनी मानले.