---Advertisement---
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे त्यांना शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. कोणताही स्वाभिमानी देश इतक्या सहजपणे माघार घेत नाही. भारतीय सैन्याची ताकत आणि समन्वयाने शत्रूची नाकेबंदी करण्यात यश आले आणि त्यामुळेच त्यांनी शस्त्रविरामासाठी तयारी दर्शवली, असे चीफ ऑफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
एका वृत्तसंस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना म्हणाले, भारताने उपग्रह प्रतिमा, स्वतःची देखरेख प्रणाली आणि ओपन सोर्स डेटाद्वारे शत्रूवर प्रहार करण्याची योजना पहलगाम हल्ल्यानंतर ४८ तासात तयार केली होती. आम्ही हल्ल्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होतो.
कारवाईला सुरुवात झाल्याच्या ८८ तासांत भारताने शत्रूचे प्रचंड नुकसान केले. पाकिस्तान सहजासहजी शरणागती पत्करणाऱ्यांपैकी नाही. मात्र भारतीय सैन्याच्या व्युहरचनेमुळे त्यांना नतमस्तक व्हावे लागले. पुढे ते म्हणाले भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू आहे.
अलीकडेच पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर विमान ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट अर्थात् एएमसीएसाठीच्या एक्झिक्युशन मॉडेलला मान्यता मिळाली. यामुळे सैन्याची ताकद वाढणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या लष्करी विचारसरणीत मोठा बदल झाला आहे. आता आमच्या प्रतिसादाची पातळी बदलली आहे.