वेतन द्या अन्यथा काम बंद आंदोलन, वॉटरग्रेसच्या कर्मचार्‍यांची प्रशासनाला तंबी

तरुण भारत लाईव्ह ।१३ जानेवारी २०२३। शहरातील दैनंदिन कचरा संकलनाचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला असून या कंपनीच्या सर्व कर्मचार्यांचे वेतन थांबलेले आहे. त्यामुळे 12 रोजी घंटागाड्यावरील वाहनचालकांनी आक्रमक भूमीका घेत महापालिकेत येऊन आयुक्त देविदास पवार यांची भेट घेतली. यावेळी आमचा पगार शुक्रवार 13 पर्यंत न झाल्यास आम्ही संपावर जावून शहरातील कचरा संकलन करणार नसल्याच इशारा त्यांनी दिला.

वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्यांचे 10 तारीख झाली तरी वेतन मिळालेले नाही. त्यामुळे हताश व आक्रमक होत घंटागाड्यावरील कर्मचार्‍यांनी आंदोलनाची भूमीका घेत पगार 13 पर्यंत न झाल्यास काम बंद आंदोलन करणार, असल्याचा इशारा सफाई मक्तेदाराच्या व्यवस्थापकाला तसेच मनपा प्रशासनाल दिला. यावर आयुक्त देविदास पवार यांनी कर्मचार्‍यांच्या प्रतिनीधीला बोलावून घेतले. यात जयेश सपकाळे, सागर पाटील, भूषण खडके, रविंद्र अहिरे यांनी आयुक्तांची भेट घेत पगार न झाल्यास कामबंद आंदोलन करणार असा इशारा दिला. वास्तविक बघता कर्मचार्‍यांचे वेतन देणे ही मक्तेदाराची जबाबदारी आहे.

मनपाकडील बिले लवकरच दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे

वेतन न झाल्यास काम बंदबाबत वॉटरग्रेस कंपनीच्या कर्मचार्‍यांची भूमीका जाणून घेतली असता, आम्हाला शुक्रवारपर्यंत पगार न मिळाल्यास आम्ही दैनंदिन कचरा संकलनाचे काम थांबवू असे सांगितले आहे. माजी आयुक्त विद्या गायकवाड हे असतांना 10 तारखेच्या आत आमचे पगार होत होते. आता काय समस्या आहे, 1 हजार कर्मचार्‍यांना कशाला वेठीस धरता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वॉटरग्रेस देते कमी पगार

वॉटरग्रेस कंपनीत काम करतांना आम्हाला 539 रुपये रोज मंजूर असतांना मक्तेदारांकडून केवळ 272 रुपये रोज मिळत आहे, या प्रकरणात देखील मनपाने लक्ष देवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आशा यावेळी जमलेल्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.