---Advertisement---
काही दिवसांपूर्वी केदारनाथ येथे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात काही भाविकांसह पायलट लेफ्टनंट कर्नल राजवीरसिंह चौहान यांचाही मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेला १३ दिवस उलटत नाहीत तोच पुत्रवियोगाने दुखी झालेल्या आईनेही जयपूर येथे प्राण सोडले.
---Advertisement---
राजवीर सिंह यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या आईला जबर मानसिक धक्का बसला होता. त्यांना आपल्या मुलाचा वियोग सहन होत नव्हता. दरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना जबर धक्का बसला होता. तसेच त्यांची प्रकृती गंभीर होती, असे डॉक्टरांनी सांगितले.
राजवीरसिंह यांना अखेरचा निरोप देतानाच त्यांच्या आईची प्रकृती खालावली होती. मुलाच्या मृतदेहाकडे पाहून त्या सारख्या बेशुद्ध पडत होत्या. दरम्यान, आता त्यांचे निधन झाल्याने आधीच राजवीरसिंह यांच्या अकाली जाण्याने शोकसागरात बुडालेल्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजवीर यांच्या पत्नीही लष्करात
राजवीरसिंह हे लष्करामध्ये सेवेत होते. निवृत्तीनंतर त्यांनी आर्यन एव्हीएशन कंपनीमध्ये पायलट म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. राजवीर सिंह यांची पत्नीही भारतीय लष्करात सेवेत असून, चार महिन्यांपूर्वीच त्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला होता.।