‘आयुष्मान कार्ड’ असलेल्यांसाठी मोठी भेट देण्याची तयारी

नवी दिल्ली :  ‘आयुष्मान कार्ड’ असणाऱ्यांसाठी मोठी बातमी. जर तुमच्याकडे हे कार्ड असेल तर तुमच्या घरातील कोणी आजारी पडल्यास तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. तुम्हाला फक्त हे कार्ड दाखवायचे आहे. आयुष्मान भारत कार्डवरील कव्हरेजची रक्कम 5 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे. ती मंजूर झाल्यास सुमारे 12 कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. एवढेच नाही तर ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही या कक्षेत सामावून घेण्याची सरकारची तयारी आहे.

केंद्र सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार आपल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या (AB-PMJAY) लाभार्थ्यांची संख्या पुढील तीन वर्षांत दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळू शकेल. सुरुवातीला ७० वर्षांवरील सर्व लोकांना याच्या कक्षेत आणले जाईल. यापैकी काही घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात होऊ शकतात.

दरवर्षी 12,076 कोटी रुपये अतिरिक्त खर्च

सरकारने ही घोषणा केल्यास सरकारी तिजोरीवर दरवर्षी 12,076 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार आहे. अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये, सरकारने योजनेचे वाटप वाढवून 7,200 कोटी रुपये केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 जून रोजी संसदेत आपल्या भाषणात सांगितले होते की, 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना आता आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाईल आणि त्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळेल. सरकारी सूत्रांनी सांगितले की, 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना त्याचा लाभ मिळाल्यास ही संख्या आपोआप चार ते पाच कोटींनी वाढेल.