Rahul Solapurkar : शिवरायांबद्द्ल केलेल्या वक्तव्यावर राहुल सोलापूरकरांनी मागितली माफी

#image_title

मुंबई : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी त्याविषयी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता, तसा विचारही कधी मनात येणार नाही असं ते म्हणाले. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये केलं होतं. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

राहुल सोलापूरकर म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली. त्यावेळी, इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा तयार होतात याबद्दल वक्तव्य केलं होतं. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी वक्तव्य केलं. तसा संदर्भ काही इतिहासकारांनीही लिहून ठेवला आहे. पण माझ्या या पूर्ण मुलाखतीतील ते दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही येणार नाही.

Nari Shakti Half page

त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी लाच हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल सोलापूरकर म्हणाले. साम, दाम, दंड, भेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये राहुल सोलापूरकर काम करत आहेत. ‘राजर्षी शाहू’ मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका बरीच गाजली होती. पण याच सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद सुरू झाला.

 काय म्हणाले होते राहुल सोलापूरकर?

“छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे असं काहीही नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वाटल्या, याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला लाच दिल्याचे पुरावेही देखील इतिहासात आहेत. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र, हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की, थोडे रंग भरून सांगावा लागतो. पण, रंजकता आली की, इतिहासाला छेद दिला जातो.”