बनावट खत उतरवितांना छापा ; भरारी पथकाने १५२ गोण्या केल्या जप्त

जळगाव :  तालुक्यातील नांद्रा येथे गुजरात राज्यातील  सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार , धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खते शेतकऱ्यांना विक्री हेतू उपलब्ध होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने संचालक(गुण नियंत्रण) विकास पाटील यांनी आवाहन केल्यानुसार गुजरात राज्यातील अवैध, विनापरवाना व बनावट खतांना आळा घालण्यासाठी नाशिक विभागातील गुण नियंत्रण शाखेने धडक तपासणी सुरु केल्या आहेत.

यानुसार शुक्रवार २० सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा भरारी पथकाला जळगाव तालुक्यातील  नांद्रा येथे गुजरात राज्यातील खत कंपनी शेतक-यांना विक्री हेतु येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी जळगाव पंचायत समिती कृषी अधिकारी धिरज बढे, जळगाव मंडळ कृषी अधिकारी अमित भोसले यांच्या पथकाने पाळत ठेवून ट्रक मधुन मे.जेनिक केमटेक कॉर्पोरेशन कंपनीचे नाव लिहिलेल्या सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना छापा टाकून जप्त केल्या.

या सेंद्रिय खतांच्या बॅगवर मे.जेनिक केमटेक कॉर्पोरेशन या खत कंपनीचे बोगस नाव टाकून शेतकऱ्यांना विक्री हेतू विक्री केली आहे. मे.दक्षकमल ट्रेडर्स, शहादा जि. नंदुरबारचे मालक संशयित चंद्रकांत पाटील हे में. जेनिक केमटेक कार्पोरेशन या कंपनीचे नाव टाकून सेंद्रिय खत शेतकरी बांधवांना विक्री करत होते.

याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी विभागीय कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी (जि प) सुरज जगताप, मोहिम अधिकारी विजय पवार, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय तंत्र अधिकारी (गु.नि) नितेंद्र पानपाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ,बनावट व विनापरवाना खत विक्री करणाऱ्या मे.दक्षकमल ट्रेडर्स,शहादा जि.नंदुरबार यांचे मालक चंद्रकांत पाटील, जोधा पंपारीया, भरतभाई, दिनेश पाटील यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुजरात येथून बोगस निविष्ठा आणून त्या शेतकरी बांधवांना विक्री करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

नाशिक विभागात अशा प्रकारच्या बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात गुण नियंत्रण शाखेने धडक कारवाई सुरू केली असून याबाबत कुणाचीही गय केली जाणार नाही असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक रविशंकर चलवदे यांनी केले आहे.