मध्य रेल्वेच्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये मासिक पास धारकांना प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. अगोदरच एकही प्रवासी मेल एक्सप्रेस वेळेत येत नाही. तसेच या गाड्यांना नवीन संरचनेनुसार सर्वसाधारण वा स्लिपर बोग्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे मासिक पासधारक व नियमित प्रवाशांना नाइलाजाने स्लिपर बोग्यांमधून प्रवास करावा लागतो. मात्र तिकीट निरीक्षकांकडून होणाऱ्या अडवणुकीचा त्यांना सामना करावा लागत आहे. यातून दोघात हुज्जत घालण्याचे प्रकार घडत आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर जळगाव जंक्शन स्टेशन आहे. येथून मुंबई, पुणे तसेच अमळनेर, धरणगावसह पश्चिम मार्गावर जाणान्या मेल एक्सप्रेस गाड्यांची संख्या मर्यादित आहे. कोरोना संसर्गापूर्वी महाराष्ट्र एक्सप्रेसला नियमित मासिक पासधारक प्रवाशांसाठी दोन बोग्या होत्या. तसेच सकाळी ७.२० आणि ८.२० वाजेदरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस आणि देवळाली शटल अशी दोन गाड्यांची प्रवासी सेवा होती.
देवळाली तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसने शासकीय, खासगी आस्थापनांमधील तसेच शाळा, महाविद्यालयीन उच्च शिक्षणासाठी सुमारे साडेचार ते पाच हजारांहून अधिक नागरिक दररोज ये-जा करतात. कोरोना संसर्गानंतर महाराष्ट्र एक्सप्रेस, देवळाली पॅसेंजरच्या वेळा बदलण्यात आल्या. सकाळी ६.१८ महाराष्ट्र एक्सप्रेस, तर त्यादरम्यान कुशीनगर ६.२५, महानगरी ६.०० तर अमृतसर ५.४५ अशा अवेळी गाड्या आहेत. देवळाली एक्सप्रेसची ८.३० ऐवजी १०.४० अशी वेळ करण्यात आली आहे. ती गाडी कधीही वेळेवर येत नाही.
जळगाव येथे १२.३० वाजेनंतरच येते. यामुळे ही गाडी कोणत्याही शालेय, महाविद्यालयीन वा शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सोयीची नाही. तसेच कोरोना संसर्गापूर्वी सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्र. ७.३० वाजता अमृतसर-दादर, ८.१० वाजेला कुशीनगर, तर ९.१० वाजेला शालिमार १८०३० या वेळेत होत्या. यामुळे शासकीय कार्यालयातील वेळेनंतरदेखील अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना सोयीच्या गाड्या होत्या. परंतु कोरोना संसर्गानंतर सायंकाळच्या गाड्यांच्या वेळेतदेखील तब्बल अडीच ते तीन तासांचा फरक होऊन सर्व गाड्या ५.३० व ६.३० च्या अगोदर आहेत. याशिवाय ९ वाजून ०७ मिनिटांनी येणारी १८०३० शालिमार एक्सप्रेस कधीच वेळेवर येत नाही. रात्री उशिरा जळगाव स्थानकावर येते.
सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसच्या एस १० बोगीतील चल तिकीट निरीक्षकाने गर्दी नसतानासुद्धा मासिक पासधारकांना अद्वातगा बोलत अपमानित केले. महाराष्ट्र एक्सप्रेसला सर्वसाधारण बोग्यांमध्ये मरणाची गर्दी असून पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. तसेच सायंकाळी ६ वाजेनंतर बरीचशी शासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र एक्सप्रसेनंतर एकही गाडी नाही. अशा परिस्थितीत मासिक पास धारकांना नाइलाजाने आरक्षित बोगीत उभे राहावे लागते.
महाराष्ट्र एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे नियमित मासिक पास धारकांसाठी दोन बोगी जोडण्यात याव्यात. जेणेकरून मासिक पास धारक आरक्षित बोगीत बसणार नाहीत, तसेच देवळाली एक्सप्रेस सकाळी ७.३० ऐवजी पूर्वीप्रमाणे ५ वाजेला पहाटे देवळालीवरून सोडण्यात यावी, जेणेकरून शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांमधील कर्मचारी, अधिकाऱ्यांना तसेच सर्वसामान्य दररोज अपडाऊन करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल. परिणामी आरक्षित बोगीतील प्रवाशांना मासिक पासधारकांचीदेखील अडचण जाणवणार नाही. अशी मागणी व्यापारी व प्रवासी संघटनेचे रमेश मदनाणी यांनी केली आहे.