दिलासा! राज्यात ‘या’ भागात पुढील ३ दिवस जोरदार पावसाची शक्यता

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। महाराष्ट्रात सगळीकडे तापमान वाढले आहे. दरम्यान आता काहीसा गारवा निर्माण शक्यता आहे. आजपासून पुढील ३ दिवस काही  ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासोबत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे देखील वाहणार आहे, आयमडी पुणे विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार कायम असल्याचे चित्र पहायला मिळतेय, दरम्यान, रविवारी आजपासून विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. २०) राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अकोला येथे ४४.४ अंश सेल्सिअस इतकी झाली. मराठावाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याच भागात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे आहे.

मंगळवारपर्यंत (ता. २३) नव्याने पश्‍चिमी चक्रावाताची स्थिती निर्माण होणार असून, याचा परिणाम वायव्य भारतावर होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत राज्याच्या तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचे अंदमानात निर्धारित वेळेत आगमन झाले असून, लवकरच ते केरळमध्ये दाखल होणार आहेत.

केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा पुढेही प्रवास अडथळाविना कायम राहिल्यास मॉन्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात धडकण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि परिसरातसुद्धा उन्हाचा ताप जाणवू लागला आहे. शनिवारी (ता. २०) शहरात ३८.५ अंश सेल्सिअस इतके होते. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर शहर व परिसरात कमाल तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. मात्र उन्हाची स्थिती अशीच राहणार आहे.