महाराष्ट्रावर आस्मानी संकट? उद्यापासून चार दिवस मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

जळगाव/पुणे : सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे आधीच बळीराजा चिंतेत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात उद्यापासून (4 मार्च) 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्याला देखील इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल होत असून फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात उकाडा वाढला आहे. दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने उद्या म्हणजेच शनिवारपासून पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

या जिल्ह्यांना इशारा?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या स्वरुपातील पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.

अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.