विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काल झालेल्या प्रकाराने नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांच्या निलंबनाची घोषणा केली.

अंबादास दानवे यांच्या निलंबनानंतर सत्ताधारी तसेच विरोधक आक्रमक झाले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना बोलण्याची परवानगी दिली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत आक्षेप नोंदविला. यानंतर विरोधकांना संधी नाकारण्यात येऊन पुढील कामकाज करण्यात आले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ उडाला. अंबादास दानवे यांनी आपल्याकडे हात दाखविणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर मंगळवारी प्रसाद लाड यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत निषेध व्यक्त केला. यावेळी लाड यांनी अंबादास दानवेंनी माफी मागावी आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तर चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली. चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर मताला टाकला. आवाजी मतदानानं अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली