पाचोरा : महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतांना राज्यात सर्रासपणे गोवंश हत्या व तस्करीच्या घटना उघड होत आहेत. अशा घटना लक्षात घेऊन बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या व तस्करी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी पाचोरा शहर व ग्रामीण विहिप व बजरंग दलातर्फे पाचोरा पोलिसांना निवेदयाद्वारे करण्यात आली आहे.
राज्यातील बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पडघा (भिवंडी), मालेगाव (जि. नाशिक), सातारा, धुळे, धाराशिव, सोलापूर, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये गोवंश हत्या थांबण्याचे नाव घेत नसून, ही हत्या आणि तस्करी खुलेआम सुरू असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यासोबतच, राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेषतः तेलंगणा व कर्नाटकच्या सीमांवर गोवंश तस्करीचा मोठ्या प्रमाणावर होत आहे.

या पार्श्वभूमीवर गोरक्षक संघटनांचे कार्यकर्ते आपल्या जिवावर उदार होऊन गोवंश रक्षणासाठी मैदानात उतरलेले असताना, त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांना छळले जात असल्याचे गंभीर आरोप विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. यावेळी आगामी ७ जून रोजी साजरी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती, वरखेडी येथे सध्या खुलेआम गोवंशाची खरेदी-विक्री केली जात आहे. या खरेदीचा उद्देश थेट गोहत्येसाठीच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या बाजारावर तातडीने कारवाई करत गोवंशाची तस्करी व गोहत्या थांबवाव्यात, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना विहिप मंत्री योगेश सोनार, बजरंग दल प्रखंड संयोजक बंटी पाटील, विहिप प्रखंड गोरक्षा प्रमुख राहुल मधुकर पाटील, विहिप प्रचार प्रसार प्रमुख योगेश पाटील तसेच गोरक्षा क्षेत्रातील कार्यकर्ते गौरव पाटील, जीतू लोणारी, बंडू पांचाल, सोपान शिंपी, जय बागुल, आकाश पाटील, रोहित पाटील, गोकुल पाटील, दक्ष पाटील, दिनेश भोई, प्रमोद वाघ आदी उपस्थित होते.