---Advertisement---
---Advertisement---
जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून, १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यात खान्देशातील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात गेल्यात दोन आठवड्यांपासून मान्सूनचा प्रवास रखडला आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. यादरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. खानदेशातील अनेक भागात कमाल तापमान ४० अंशांवर राहण्याचा अंदाज आहे.
१४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा दुपारनंतर आणि मेघगर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
यादरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.