आचारसंहिता बाजुला सारा, बोदवड तालुक्यातील पाणी टंचाईवर उपायोजना करा, कोणी केली मागणी ?

जळगाव : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन वाढत्या तापमानाबरोबर पाणी टंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. यात सर्वाधिक झळा ह्या कायम दुष्काळी छायेत असणाऱ्या बोदवड तालुक्याला बसत आहे. बोदवड तालुक्यात कोणताही नैसर्गिक पाण्याचा मोठा स्रोत नाही तसेच यावर्षी झालेल्या कमी पावसाळ्यामुळे विहरींची जलपातळी खालावली आहे त्यामुळे बोदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई निर्माण झाली असुन नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

एकीकडे तीव्र पाणीटंचाई असतानाप्रशासन आणि लोकप्रतिनिधी सध्या लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात आलेली नाहीत त्यामुळे नागरिकांचे गुरांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहे. तरी प्रशासनाने आचारसंहिता बाजुला ठेऊन तत्काळ विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण ,टँकर द्वारे पाणीपुरवठा अशा उपाययोजना करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे बोदवड तालुका हा कायम अवर्षणग्रस्त तालुका म्हणुन ओळखला जातो. या तालुक्यात पाण्याचा कुठलाही नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे पाणी पुरावठ्यासाठी संपूर्ण तालुक्याला मुक्ताईनगर येथुन पुर्णा नदीवरून असलेल्या ओ.डी.ए. पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून रहावे लागते.ओ.डी.ए. योजनेदवारे बोदवड तालुक्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. परंतु विद्युत पुरवठा आणि काही तांत्रिक कारणाने तसेच ओ.डी.ए. योजनेची पाइपलाइन हि सतत फुटत असते ती दुरुस्त करायला विलंब होतो या कारणाने चार पाच दिवसाआड मिळणारे पाणी दहा बारा दिवसाआड मिळते.

काही गावांमध्ये थोडा फार पाणीसाठा असलेल्या विहरीद्वारे पाणी पुरवठा केला जातो परंतु यंदा अत्यल्प झालेल्या पर्जन्यमानामुळे विहरींमध्ये जलसाठ्याची कमतरता आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसानंतर उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे त्यामुळे वाढते बाष्पीभवन आणि सततचा होणारा पाणी उपसा यामुळे विहरीं मधील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बोदवड तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे यात प्रामुख्याने गोळेगाव बु, गोळेगाव खु,, धानोरी, वडजी, वरखेड बु, वरखेड खु, मानमोडी, वराड बु, जलचक्र खु, जलचक्र बु, पळासखेडा, नाडगाव,मुक्तळ,जुनोने या चौदा गावांमध्ये नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना,गुरा ढोरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

सध्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत गुंतले असल्यामुळे पाणीटंचाई वर करण्यात येणाऱ्या उपाययोजना अजूनपर्यंत केल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे. तरी आपण आपल्या स्तरावरून उचित कार्यवाही करून आचारसंहिता बाजुला ठेवुन तालुका प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन शक्य त्या गावात विहरींचे अधिग्रहण ,विहिरींचे खोलीकरण ,शक्य तिथे नविन ट्युबवेल कराव्यात जेथे शक्य नसेल तिथे टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची लवकरात लवकर व्यवस्था करून नागरिकांना,गुरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून पाणीटंचाईची ताीव्रता कमी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर उपाययोजना न केल्यास बोदवड तहसिल कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकरी ,महिला गुरा ढोरांना घेऊन हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, सध्या तापमान ४३ अंश सेल्सिअस पर्यंत गेले असुन या कडक उन्हाळ्यात बोदवड तालुक्यातील गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने प्रशासनाने पाणी टंचाई वर करण्यात येणार्‍या उपाययोजना अद्याप केल्या नाहीत त्यामुळे नागरिकांचे ,गुरांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. काही गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोरान भटकावे लागत आहे , अर्धा उन्हाळा उलटून अद्याप विहिरीचे अधिग्रहण झालेले नाही ,टँकर सुरू झालेले नाहीत त्यामुळे प्रशासनाने निवडणुकीच्या कामातून थोडा वेळ काढून व आचारसंहितेचा बडगा बाजूला सारून तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना पाणी टंचाई पासुन दिलासा द्यावा अन्यथा तहसिल कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.