खोटेबाजीचा पतंग उडवणं आता सोडा! राऊतांना कोणी लगावला टोला ?

मुंबई : रामाच्या नावावर खोटेबाजीचा पतंग उडवणं आता सोडा, असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. राम मंदिरात गळती होत असल्याची अफवा विरोधकांकडून पसरवण्यात आली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, “रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहात कुठलीही गळती होत नसल्याचं कालच राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे. पण, तुम्ही सोईस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलंत. त्यामुळे परत एकदा तुमच्या माहितीसाठी सांगते की, या मंदिराच्या गुरू मंडपाचा भाग खुला असून तिथे काम अद्याप सुरू आहे. मंदिराच्या दुसऱ्या मजल्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तो भाग झाकला जाईल.”

“त्यामुळे तिथेही कदापि पाणी येणार नाही. ही वस्तुस्थिती असतानाही तुमची रामाच्या नावावर खोटं खपवण्याची धडपड सुरू असल्याचं पाहून कीव करावीशी वाटते. रामाच्या नावावर खोटेबाजीचा पतंग उडवणं आता सोडा,” असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.