---Advertisement---

इच्छागव्हाण मध्यम प्रकल्पाची गळती ‘जैसे थे’, संबंधित विभाग अद्याप फिरकलाच नाही !

---Advertisement---

मनोज माळी
तळोदा :
इच्छागव्हाण येथील मध्यम प्रकल्पाला गेल्या वर्षी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसात गळती लागली होती. परिणामी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने विमोचकाद्वारे पाणी सोडण्यात आले होते. यावेळी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोन-दिवस तळ ठोकून होते. मात्र, त्यानंतर संबंधित विभाग त्याकडे फिरकलाच नसल्याने या प्रकल्पावर झालेला लक्षावधी रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. परिणामी प्रकल्प तसाच राहिला असून, यावर्षीदेखील या प्रकल्पात जलसाठा होणार नाही. त्यातच या प्रकल्पाच्या गळतीला जबाबदार असणाऱ्या अभियंतांवर काय कारवाई केली ते देखील अद्यापी गुलदस्त्यात आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या इच्छागव्हान येथे जलसंपदा विभागाकडून मध्यम प्रकल्प बांधण्यात आला असून या प्रकल्पात पाण्याची साठवणूक क्षमता २.१ दसलक्ष इतकी असून गतवर्षी पहिल्यांदा जलसाठा करण्यात आला होता. सातपुड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दि. २० जुलै २०२४ जलसाठा वाढल्याने अचानकपणे प्रकल्पाला गळती लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. धरण फुटण्याची भीती निर्माण झाली होती, प्रकल्पामुळे कुठलाही धोका उद्भवू नये यासाठी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दोन-दिवस प्रकल्पातील पाण्याच्या विसर्ग करण्यासाठी तळ ठोकून होते.

अधिकाऱ्यांची उदासिनता

या प्रकल्पातील पाण्याचे विमोचकाद्वारे, तसेच धरणाचा पूर्वस जे.से.बी यंत्राच्या साहयाने पाटचारी काढून पाण्याच्या विसर्ग करण्यातआला होता. पावसाळा संपल्यानंतर सदर प्रकल्प दुरुस्ती करण्याचे क्रमप्राप्त असल्याने प्रकल्पाशी संबंधित यंत्रणा दि.२१ जुलै २०२४ घटनास्थळी पोहचली होती. त्यानंतर दि. १४ मे २०२५ पर्यंत पोहोचली नाही. परिणामी प्रकल्प तसाच राहील्याने यावर्षीदेखील या प्रकल्पात जलसाठा होणार नाही. शासन या भागातील नागरीकांना जलसिंचनासाठी लक्षावधी रुपयांचा खर्च करत असून या प्रकल्पाकडे संबंधित यंत्रणा फिरकलीच नसल्याने या विभागातील अधिकाऱ्यांची उदासिनता समोर आली आहे आहे.

आमलेबारी लघु प्रकल्पाचीही अशीच स्थिती

अक्कलकुवा तालुक्यातील आमलेबारी येथे देखील लघु प्रकल्प बांधण्यात आला होता मात्र, तोही पहिल्याच वर्षी जलसाठा केल्यानंतर सातपुड्यात झालेल्या अतिवृष्टीने गळती लागल्याने वाहून गेला होता. तळोदा तालुक्यातील इच्छा गव्हाण येथील मध्यम प्रकल्प ही पहिल्याच वर्षी जलसाठा झाल्यानंतर त्यास गळती लागल्याने जलसाठ्याचा विसर्ग करण्यात आला होता. हे दोन्ही प्रकल्प सातपुड्याच्या अगदीच पायथ्यावर बांधण्यात आल्याने पावसाळ्यात सातपुड्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या जोर अधिक असल्याने या प्रकल्पांचे भविष्य धोक्यात आहे. याबाबत प्रकल्प तयार करणाऱ्यां यंत्रणा कशी अनभिज्ञ राहते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---