चंद्रशेखर जोशी
जळगाव शहराचा नागेश्वर कॉलनीचा परिसर. कोणाच्या अध्यात ना मध्यात असलेली माणसं, शांतताप्रिय तसेच ममतेच्या मूर्ती अशा महिला. शहराच्या एका बाजूला, फारशा गजबजाट नसलेल्या वस्तीचा हा भाग. एक चिमुरडा घराजवळ खेळत होता. हातातील चेंडू त्याने घराच्या वॉल कंपाऊंडकडे फेकला. चुकून तो कंपाउंडच्या बाहेर गेला.
तो चेंडू घेण्यासाठी हा चिमुरडाजीव निरागसपणे दुहुदुडु धावत बाहेर आला… अन् येथेच घात झाला… क्षणात त्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली… या चिमुरड्याचा गळाच पकडला… कौतुकाने भरलेल्या डोळ्याने आपल्या मुलाकडे पाहणाऱ्या त्या मातेच्या डोळ्यांमध्ये क्षणात भयाची छटा पसरली… काळजात धस्स झालं. देहभान विसरून, वाऱ्याच्या वेगानं धावताना काळीज चिरून जाणारी तिची किंचाळी ऐकून लोकही धावले. ती बाहेर रस्त्यावर आली… कसंबसं स्फुंदतच तिनं आपल्या बाळाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविलं. पण… ते निरागस बाळ भयानं बेशुद्ध झालं होतं… गलीतगात्र झालं होतं.
आजूबाजूच्या लोकांनी पळापळ करून त्या चिमुकल्याला उचललं.. तातडीनं जिल्हा रुग्णालयात हलविलं… पुढचे सोपस्कार सुरू झाले. केस पेपर… डॉक्टरांनी उपचार सुरू केले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता, काळजी आणि भीती पसरलेली. छातीचे ठोके वाढलेले… काही होवो पण बाळ जगलं पाहिजे, वाचलं पाहिजे ही भावना… तसाच साऱ्यांचा आशावाद… घड्याळाचे काटे सरकत होते… तसतशी मनात धाकधूक वाढत होती.. अन् तशात मनाला हादरा देणारा तो निरोप आला… बाळ गेले… कुत्र्याच्या हल्ल्यात ते बाळ गतप्राण झाले होते… हे ऐकल्यावर त्या मातेचा हंबरडा आसमंत चिरून जाणारा होता… थरथरणारा देह, विस्फारलेले नेत्र, त्यातून वाहणारे अबोल अश्रू… शेजारी सुन्न झाले… महिलांच्या डोळ्यापुढे ग्लानी आली… गल्लीत निरागसपणे खेळणारे… दुडुदुङ धावणारे, बोबड्या बोलांनी सर्वांना मोहविणारे… सर्वांना आपलेसे करणाऱ्या त्या बालकाची छबी शेजाऱ्यांच्या नजरेतून फिरू लागली… क्षणात होत्याचे नव्हते झाले होते… परिसरातील साऱ्यांचेच डोळे अश्रृंनी डबडबले होते. युवक वर्गात तर संतापाची तीव्र लाट उसळली होती… महापालिका प्रशासनाविरोधात संताप सुरू झाला… शिव्यांचे संस्कार नसल्याने केवळ चीड, अनावर संताप, आक्रोश, हतबलता असे संमिश्र वातावरण परिसरात होते. अनेकांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले… एकच प्रश्न केला जात होता, निरागस बाळाच्या मृत्यूला जबाबदार कोण?… त्या महिलेतील आई, तिची ममता याही स्थितीत जागृत झाली… ती म्हणाली… माझं बाळ तर गेलं… इतरांच्या बाळांची तरी काळजी करा हो… त्यांना घराबाहेर मोकळेपणे खेळता येईल अशी स्थिती निर्माण होऊ द्या…
जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी परिसरातील हा थरारक प्रसंग… याच परिसरातील आणखी काही जणांना त्या पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले… याच परिसरातील एक महिला कुत्र्याच्या चाव्याने जखमी झाली. आजही ती धड चालू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. परदुःख शीतल असतं असं म्हटलं जातं… या दाम्पत्याच्या दुःखाचा विचार कोण करणार? घरातलं एक हसतखेळतं बाळ निमिषार्धात काळाच्या स्वाधीन होतं.
त्यांच्या मनावर काय आघात झाला असेल? मात्र या घटनेनंतर सर्वच जागे झाले… राजकीय मंडळी आयतंच कोलीत मिळाले म्हणून आंदोलनाला उतरली… आयुक्तांच्या टेबलावर खेळण्यातील श्वान ठेवले गेले… इशारे दिले गेले… त्याच्या आम्ही बातम्या छापल्या… आंदोलनातील फोटोत आपण दिसावे म्हणून काहींची धडपड दिसली… तो कृत्रिम दुःखाचा देखावा… संतापजनक ठरत होता… याचे कारण एवढे दिवस ही मंडळी शांत कशी…?
एखाद्या व्यक्तीचा बळी पडल्यावर आंदोलने होतात… विविध देखावे आंदोलनांच्या माध्यमातून दाखविले जातात… पण घटना घडू नये म्हणून जी खबरदारी बाळगणे गरजेचे असते त्यासाठी पाठपुरावा का होत नाही? आमच्यातील माणुसकी केवळ देखावा ठरतेयं याचे साधे भानही ही मंडळी ठेवत नाही… किती हे दुर्दैव… आणि रहाता राहिली आमची महापालिका… अनेक द्वाड मंडळी येथे काम करते… अरे एक दिवस शिपाई म्हणून काम अन् दुसऱ्या दिवशी इंजिनीयर केवढा हा चमत्कार… जगाच्या पाठीवर असा चमत्कार दिसणार नाही… याच पद्धतीने काम करणाऱ्या काही मंडळींच्या हातात सध्या मोठमोठ्या पदांचा कार्यभार आहे.
या मंडळींची पदेपण मोठमोठी झाली…. प्रमुखांची हुजरेगिरी करून मिळविलेल्या पदांना ही मंडळी न्याय देऊ शकत नाही, हेच लक्षात येत आहे. परिणामी मनपातील प्रशासकीय यंत्रणेवरून नागरिकांचा विश्वास उडत चाललायं. गत आठवड्यांत एका बालकाचा बळी गेला. या घटनेबाबत ही यंत्रणा फारशी गंभीर नसत्याचेच लक्षात येते. याचा भडका उडू शकतो, हे या मंडळींनी लक्षात घेणे गरजेचे आहे. या शहरात चाललंय तरी काय? असा प्रश्न जनतेला पडत आहे. रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यात सातत्य नाही. विकासाच्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत, मात्र त्यातही फारसे यश नाही. मग सर्वसामान्य जनतेचे होणार काय?