राज्य डिसेंबर 2024 अखेरीस हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे : ना. गुलाबराव पाटील

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत  विविध घटकांची कामे पूर्ण करुन राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत संपूर्ण राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, यांची आढावा बैठक दि.24 जुलै  रोजी  सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे पार पडली. या  बैठकीकरीता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,  पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ई..रविंद्रन, , अति. अभियानचे संचालक शेखर रौंदळ,  नेत्रा मानकामे, उपसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या  बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिलेले की, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अतंर्गत  वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम या घटकांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन या सर्व घटकांची कामे कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहे.  इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्याची प्रगती कमी आहे. यासाठी प्रत्येक जिल्हयांने स्वच्छतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन कामे अधिक गतीमान करावीत. जेणेकरुन गावपातळीवर दृष्यमान शाश्वत स्वच्छता दिसून येईल. त्यामुळे राज्यातील सर्व गावे मॉडेल घोषित करण्याचा आलेख वाढवून राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे असे आवाहन केले.