राज्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत असून, तापमानाचा पारा सतत वाढताना दिसत आहे. कोकणात उष्णतेची लाट काहीशी ओसरली असली, तरी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे.
राज्यात उष्णतेची लाट कायम
पश्चिम राजस्थान आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे. या हवामान स्थितीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत तापमानात वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी, डहाणू, धुळे येथे तापमानाचा पारा ३६ अंशांपार गेला आहे. किनारपट्टी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. परिणामी, सांताक्रूझमध्ये उष्णतेची लाट कायम राहिली.
रत्नागिरी, सोलापूर, नाशिक, मालेगाव, जळगाव, सांगली, भंडारा, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ येथेही तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक नोंदले गेले. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाड्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात उन्हाच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता. २८) २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान
शहर कमाल तापमान किमान तापमान
पुणे ५.२ १७.१
धुळे ३७ १२
जळगाव ३६.२ १६