Jalgaon News : जिल्हा परिषदेची ‘ही’ बंद शाळा तळीरामांसाठी अड्डा!

खिर्डी, ता. रावेर : खिर्डी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडावू झाल्यानंतर ती पाडण्यात न आल्याने ही बाब तळीरामांच्या पथ्थ्यावर पडली आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शाळेच्या परिसरात प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावात तीन अंगणवाड्या असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत चिमुरड्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळीरामांच्या आश्रयस्थानामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

वेळीच दखल घेण्याची अपेक्षा

खिर्डी गावातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील अनेक वर्षांपासून उघड्यावर पडलेल्या खोल्या तळीरामांसाठी अड्डा ठरत आहेत. काही खोल्या शौचालयासाठी वापरल्या जात असल्याचे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केरकचराही साचला असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. संबंधित प्रशासनाने लवकरात येथे उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमध्ये होत आहे. खिर्डीच्या ज्ञान मंदिरात तळीराम मद्य सेवन करून त्याचठिकाणी रीकाम्या बाटल्या फेकत आहेत.

खिर्डीतील वर्दळीचा मार्गच असुरक्षित
पया मार्गावर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज व कॉम्प्युटर आदी क्लासेस आहेत. मार्गाचा वापर शालेय विद्यार्थिनी व महिला, ज्येष्ठ ग्रामस्थ ये-जा करीत असल्याने दोन्ही इमारतीमध्ये दुर्गंधी, दारुच्या बाटल्यांचा खच साचला आहे.