---Advertisement---
जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून, जळगाव जिल्ह्यात बुधवारी (१८ जून) रोजी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याशिवाय नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यात देखील येलो अलर्ट जारी केला आहे.
---Advertisement---
दुसरीकडे जिल्हयात खरीप हंगामासाठी बळीराजा कामाला लागला आहे. पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. जून महिना अर्धा संपला तरी अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्हयात काही भागात पेरण्या खोळबल्या आहेत. पेरणी उशिरा होणार असल्याने शेतकरीवर्गात चिंताही व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामाच्या तयारीत असलेल्या बळीराजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बियाणे, खते, औषधे खरेदी करूनसुद्धा पेरणी सुरू करता न आल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. जून महिना खरीप पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, अद्याप समाधानकारक, पेरणीलायक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतजमीन कोरडीच असून, पेरणीची कामे रखडली आहेत.