बोलणे

 

आपले वय, अनुभव, अधिकार, जबाबदारी, प्रसंग, काळ याबरोबर बर्‍याचदा बोलणेही बदलते. बोलण्याबाबत काहींचा हातखंडा असतो म्हणजे त्यांना फक्त बोलण्यासाठीच बोलावले जाते. आणि ते ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. तर काहींना आता गप्प बसायचं काय घेशील, असेही प्रेमाने विचारतात.

बोलणार्‍याचा अभ्यास किती? यावरूनदेखील लोक बोलणार्‍याची किंमत करत असतात. काय बोलतोय हे लक्ष देऊन ऐक, असे सांगतात, तर काही वेळा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही बोलून दाखवतात. काही बोलणे कानावर येते, तर काही आपण मनावर घेतो. काहींच्या बोलण्याबद्दल लिहिले जाते, तर काहींच्या लिहिण्याबद्दल बोलले जाते. बोलण्याने माणसे जवळ येतात, तशीच लांबदेखील जातात. प्रेम आणि कटुता, आपलेपणा आणि परकेपणा बोलण्यातून जाणवतो. राग, द्वेष, अहंकार, प्रेम, गर्व, अभिमान, कौतुक, भावना या गोष्टी वागण्याबरोबरच बोलण्यातून जाणवतात. बोलण्यात स्वाभिमान असतो. तसेच बोलण्यात नम्रता, ताठरपणादेखील असते. बोलताना नकळत माणसाचे अंतरंग जाणवतात.
बोबडे बोलण्याच्या कौतुकापासून, आजकाल वयोमानाने त्यांचे बोलणे नीट समजत नाही. या सगळ्या अवस्थेत आपण वेगवेगळ्या पध्दतीने बोलत असतो. काही बोलून मोकळे होतात, तर काही मोकळेपणाने बोलत असतात. बर्‍याचदा कुणी आपल्याशी बोलावं किंवा आपल्याबद्दल (चांगले) बोलावं अशी इच्छा असते. बोलण्यात ताकद आहे, बोलणार्‍याची मातीदेखील विकली जाते, असे म्हणतात. त्याचबरोबर बोले तैसा चाले… असेही म्हणतात. लेकी बोले सुने…, किंवा बोलायची कढी… हेदेखील सर्वश्रुत आहे. तिळगूळ घ्या, गोड बोला… असे सांगत आम्ही सणदेखील साजरे करतो. बोलता बोलता बर्‍याचशा गोष्टी समजतात, तर बर्‍याच गोष्टी बोलता बोलता करायच्या राहून जातात.

काही (राजकारणी) नुसतेच बोलत असतात, तर काही बोलण्यातून राज आणि कारण दोन्ही शोधत असतात. काही मोजके, मुद्याचे, नेमके, आणि वेळेवर बोलतात, तर काहींना मुद्यावर या, नमनाला घडाभर तेल कशाला, असे सांगावे लागते.
काही वेळा घरातील अबोलादेखील बरेच काही बोलून जातो. नुसत्या डोळ्यांच्या हालचालीनेदेखील काय बोलायचे आहे याचा अंदाज येतो. पण बोलणे हे होते आणि लागतेच. काही वेळा मंडळी ठरवून एकत्र येऊन बोलणी करतात्, तर काही वेळा बोलणी ऐकून घ्यायला लागतात.
मोठ्यांना बोलण्याचा अधिकार असतो, तर लहान तोंडी मोठा घास हेदेखील बोलण्याबाबतच असते.
असो, लिहिता लिहिता मनातले बरेच बोलून गेलो. मनातलं बोलण्यासाठी काही खास माणसं असतात, तर काही खास माणसं मनातलं बरोबर ओळखतात.

 

कौस्तुभ परांजपे                                                                                                                                                                                                                                            ९५७९०३२६०१