धक्कादायक! ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले, संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टरला लावली आग

जळगाव : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना आव्हाने येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. यात तीन महिलांसह रिक्षा चालका जखमी झाला. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी रिक्षाला ठोकणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावली. या घटनेने जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील आव्हाणे येथील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. राहूल बारेला (रा. मध्यप्रदेश ह.मु. आव्हाणे ता.जि.जळगाव) यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून आज दुपारी ३ वाजता आव्हाणे गावातील मरीमाता मंदिराकडून येत होता. या ट्रॅक्टरने जळगावकडून येणाऱ्या (एम.एच.१९,१४१३) रिक्षाला उडविले. त्यात तीन प्रवाशांसोबत रिक्षा चालक जखमी झाला. ही घटना गावाच्या बसस्थानकावर घडली. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला. या घटनेनंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी रिक्षाला ठोकणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावली. त्याचवेळी गिरणा नदीपात्रातून येत असलेल्या एका ट्रॅक्टरला देखील ग्रामस्थांनी आग लावली. दोन्ही ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पेटवून लावले.

ही घटनेला दीड तास उलटून सुद्धा घटना स्थळी पोलीस किंवा महसुल प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळावर पोहचला नाही. त्यात नदीपात्रात असलेले सर्व ट्रॅक्टर व डंपर देखील गायब झाले. मात्र, तरीही महसुल व पोलीस यंत्रणेपैकी कोणीही घटनास्थळी पोहचलेले नव्हते. दरम्यान, दोन्ही ट्रॅक्टरवर विना नंबर असल्याने हे ट्रॅक्टर नेमके कोणाचे हे कळले नव्हते. ही घटना घडल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांनी जागेवर ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पसार झाले. अपघातानंतर आव्हाणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी उभे असलेले दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दीड तासानंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे काम सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेची जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.