मेथी (शिंदखेडा): शिंदखेडा तालुक्यासह अन्य परिसरात ढगाळ वातावरणासह बेमोसमी पाऊस झाला आहे. त्यातच ‘महावितरण’कडून मान्सूनपूर्व कामांच्या नावाखाली अघोषित भारनियमन केले जात आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मेथी परिसरात ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील विखरण उपविभागांतर्गत मेथी, वरझडी, सोनशेलू, कामपूर आदी गावांना वीजपुरवठा आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी दुरुस्तीचे कोणते काम करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लहान-मोठ्या दुरुस्तीव्यतिरिक्त ठोस कामे होत नसल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. ‘महावितरण’चे वायरमन व लाइनमनकडून कोणती कामे होत असून, ग्राहकांच्या असुविधांबद्दल कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोणतीही जाणीव नसल्याचेच दिसून येत आहे. वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, त्यांची नुकसानभरपाई महावितरण करणार का, असा प्रश्न लघुउद्योजकांसह व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्याला अजूनही सुरुवात झालेली नसताना विजेचे वेळी-अवेळी होणारे अघोषित भारनियमन, रात्रंदिवस तासन्तास खंडित, तसेच कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांच्या वीज उपकरणांचे होणारे नुकसान महावितरण भरून देईल का, असाही संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
वेळी-अवेळी व थोड्याशा पावसामुळे उष्णतेची दाहकता, तसेच उन्हाळ्याच्या दिवसांत डासांच्या उत्पत्तीमुळे आबालवृद्धांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. यातून ‘महावितरण’ने ग्राहकाभिमुख सेवांनुसार आवश्यक तो बदल करावा, अशी अपेक्षा मेथी परिसरातील ग्राहकांकडून केली जात आहे.
मेथी परिसरात कमी दाबयुक्त वीजपुरवठा, एकाच रोहित्रावर पडणारा अतिरिक्त भार, एकाच फेजवर असलेले जास्तीच्या वीजजोडण्या, असमान वीज वितरण आदी मूलभूत समस्या सोडवण्यात वीज वितरण कर्मचाऱ्याला आतापर्यंत यश मिळालेले नाही.
मेथी गावात जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या केव्हाही तुटून पडल्याने होणाऱ्या संभाव्य अपघातापासून ग्रामस्थांची सुटका करावी, तसेच वाहिनीद्ारे वीजपुरवठा सुव्यवस्थित करावा, अशी मागणी होत आहे. अघोषित भारनियमनामुळे ग्राहकांकडून रोष व्यक्त केला जातो आहे. मात्र, महावितरण ग्राहकांच्या भावनेला शून्य किंमत देत त्यांच्या ग्राहकसेवेत कोणताही आवश्यक ग्राहकाभिमुख बदल केला जात नाही. ‘महावितरण’ने लवकरात लवकर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असे अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.