बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यासाठी सीमेवर AI तंत्रज्ञानाचा वापर; पकडले ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज

अगरतला : भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना रोखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने सुसज्ज कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जात आहे. हे विशेष कॅमेरे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सुरक्षा वाढवण्यासाठी आणि घुसखोरांना रोखण्यासाठी वापरण्यात येत आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, कॅमेरा आणि फेशियल रेकग्निशन डिव्हाईससह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमेवर पाळत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे घुसखोरी, गुन्हेगारी आणि इतर अवैध कामांना आळा बसेल.

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनीही घुसखोरीला आळा घालण्यासाठी बीएसएफला राज्यातील भारत-बांगलादेश सीमेवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बीएसएफने रविवारी सांगितले की त्यांनी सीमेवर सुरक्षा आणखी कडक केली आहे. याशिवाय अतिरिक्त पथके सघन भागात तैनात करण्यात येत असून राज्य पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांसोबत संयुक्त मोहिमेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

बीएसएफचे आयजी म्हणाले की, या तंत्रज्ञानाचे परिणाम जमिनीवर दिसत आहेत. चालू वर्षात २९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून १९८ बांगलादेशी नागरिक आणि १२ रोहिंग्यांना अटक करण्यात आली आहे. यावर्षी ३२ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आयजी म्हणाले की १ जुलैपासून शिलाँग येथे नुकत्याच झालेल्या चार दिवसीय आयजी बीएसएफ-प्रादेशिक कमांडर बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) चर्चेदरम्यान, बांगलादेशी दलाल आणि गुन्हेगारांची यादी असलेले डॉजियर बीजीबीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.