---Advertisement---

जिल्हा भाजपमध्ये सध्या चाललंय तरी काय…?

---Advertisement---

जळगाव दिनांक – चंद्रशेखर जोशी

‘पार्टी वुईथ द डिफरन्स’… अशी आगळीवेगळी ओळख असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष, प्रखर हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन चालणाऱ्या या पक्षाला लोकसभेत २०२४ च्या पंचवार्षिक निवडणुकीत फार समाधानकारक यश राज्यात मिळाले नाही. मात्र विधानसभेत भाजप महायुतीने अगदी ‘उद्धवा’ पासून बारामतीकरांना धोबीपछाड दिला आहे. राज्यात सत्ता आमचीच असे छातीठोकपणे सांगणाऱ्या मुंबईतील सकाळच्या भोंग्याचा आवाज काही काळ केवळ मतदान यंत्रातील दोषाशिवाय काहीही बरळत नव्हता. मात्र या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतील फूट व अजित पवारांचा महायुतीतील प्रवेश भाजपमधील अनेक निष्ठावंतांच्या जिव्हारी लागला. पण ज्येष्ठ पवारांचा गड गडगडला याचे थोडे का होईना, ते समाधान मनाला गारखा देऊन गेले.

याची कारणमीमांसा राज्यस्तरीय राजकीय विश्लेषकांनी अनेकदा केली. पण सर्वसामान्य कार्यकर्ते व भाजपच्या बैठकांमध्ये सतरंज्या उचलणारे व प्रचारात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नांना मात्र धक्का बसला. पक्षासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, खाल्लेल्या खस्ता, त्यांचे आजपर्यंतचे निःस्पृह कार्य कायमच उपेक्षित राहील का? त्यांना सत्तेत वाटाच मिळणार नाही का? अशी खदखद कार्यकर्ते नेत्यांकडे व्यक्त करतात. त्यांच्या आश्वासनानंतर ते गप्प बसतात. पक्ष मोठा, राष्ट्र प्रथम ही भावना मनी रुजलेली असते म्हणून ते शांत असतात. पण राज्यातील काही राजकीय मंडळी अशी आहे की, जी सत्तेशिवाय राहूच शकत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत अशी काही व्यक्तिमत्वे आहेत. त्यांच्या खिशात दोन-तीन राजकीय पक्षांच्या टोप्या सतत असतातच. मात्र ‘पार्टी वुइथ द डिफरन्स’ म्हणून ओळख असलेल्या भाजपची अशी परिस्थिती नाही.

संस्कारक्षम कार्यकर्त्यांच्या कष्टाने हा पक्ष वाढला आहे. त्याग, निःस्वार्थपणा, सुसंस्कृतता, राष्ट्रप्रेम, देशाभिमान आणि हिंदुत्व ही या पक्षाची बलस्थाने आहेत. हिंदूत्वाची पताका उद्धवसेनेने सोडली पण भाजपने ते कधी केले नाही, म्हणूनच हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने या पक्षाच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहिले. पक्षाला बळ देत आहेत, हे नाकारून चालणार नाही… पण… हा ‘पण’ आता सर्वांनाच छळतोय. जळगाव जिल्ह्याचा विचार करता हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या पक्षाचे जिल्ह्यात नामोनिशाण संपुष्ठात आले आहे. यामागे अनेक पक्ष धुरिणांचा मोठा त्याग आहे.

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नानासाहेब उत्तमराव पाटील, माजी नेते, माजी जि.प. सदस्य स्व. अशोकराव फडके, स्व. सूर्यभान अण्णा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजीराव पालवे, माजी जिल्हाध्यक्ष तथा खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे, जिल्हा भाजपचे भीष्मपितामह स्व. चंद्रकांत मेंडकी, माजी खासदार वाय. जी. महाजन, स्व. मुरलीधर दाणेज, माजी नगराध्यक्ष स्व. देसराज अग्रवाल (अमळनेर), माजी जिल्हाध्यक्ष तथा खासदार स्व. हरिभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, नारायणराव चौधरी यांच्यासह अनेक धुरिणांचा जनसंघ ते भाजप वाढीत मोठा वाटा आहे.

आज केवळ जिल्हाच नव्हे तर राज्यात संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या पाच वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत पक्षाचा झेंडा डौलाने फडकवत ठेवला… कोणी बरोबर असो वा नसो… विजय पताका भाजपचीच.. हे समीकरण ठरलेले… पक्षाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक अशी भूमिका या जिल्ह्याने ठेवलेली आहे. ही सर्व स्थिती भक्कम असताना या पक्षात सुरू असलेले किंवा सुरू झालेले इनकमिंग… का?… व कशासाठी? असाच प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर पक्षाला मतदान करणाऱ्या सर्वसामान्यांनाही पडला आहे. बरे कोण.. कोण येताय… याचा तर विचार केला जावा ना बाबांनो… माजी आमदार दिलीप वाघ यांच्याबद्दल काय सांगावे आणि सांगणार? पारोळ्याची मोरे मंडळी राजकीय निराधार झाल्याची परिस्थिती… त्यांना आधार मिळाला…

यापूर्वीही असे प्रवेश सोहळे झाले. ही परिस्थिती पाहता एक प्रश्न पडतो… भक्कम स्थितीत असलेल्या भाजपला खरोखर अशा व्यक्तींची गरज आहे काय? नव्या व्यक्तींमुळे पक्षाची ताकद वाढली, असे म्हणता येणार नाही… याचे कारण गतकाळात यांना जनतेने विविध निवडणुकांमध्ये नाकारले आहे. एक वडिलोपार्जीत वारसा टिकून रहावा असाच या मंडळींचा प्रयत्न आहे. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना या मंडळींनी वर्षानुवर्षे काय त्रास दिला, याचा कोठेतरी विचार होणे गरजेचे नाही का वाटत ?

याबाबत एक संस्कृत श्लोक आहे.. “सुलभाः पुरुषाः राजन् सततं प्रिय वादिनः। अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता, श्रोताच दुर्लभः ।।” मधुर, मनाला मोहविणारे, गोड बोलणारे खूप असतात पण कटू असलं तरी सत्य मांडणारे, हितकारक बोलणारे फार कमी लोक असतात. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. वारे कोणत्या दिशेने वाहते आहे हे राजकीय मंडळी जाणतात. त्यामुळे आता या बेडूकउड्या सुरू रहाणारच. मात्र कोणाला स्थान द्यावे, ते देत असताना स्थानिक जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होणार नाही ना? याचा कोठेतरी विचार होणे गरजेचे आहे. गोळाबेरीज लक्षात घेता भाजपची काँग्रेस तर होणार नाही ना? याकडे लक्ष देणे फार गरजेचे वाटते. हा पक्ष वर उल्लेखीत नेते मंडळींच्या त्यागातून घडला आहे. एक विचार, एक कार्यपद्धती त्यांनी घालून दिली आहे, त्याचा विसर पडू देऊ नये हीच अपेक्षा….!!

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment