शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे वंशज असल्याचा दावा करत लाल किल्याचा ताबा मागणाऱ्या महिलेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच फतेहपूर सिक्री, ताजमहालही मागा’ असा उपरोधिक टोलाही सरन्यायाधीशांनी लगावला. मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची विधवा सुत्ताना बेगमी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत
लाल किल्यावर दावा सांगितला होता. सुल्ताना बेगम यांनी कथितपणे बहादूर शाह जफर यांचे कायदेशीररित्या वशंज असल्याचाही दावा केला होता.
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला हा मुघलांचा असून त्याचा ताबा दिला जावा, अशी मागणी सुल्ताना यांनी केली होती. सुल्ताना बेगम यांची याचिका यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सोमवारी सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पी.व्ही. संजय कुमार यांच्या न्यायासनाने ही याचिका फेटाळून लावली. सदर याचिका गैरसमजुतीमधून करण्यात आली असल्याचेही सरन्यायाधीश संजीव खन्त्रा म्हणाले. तसेच त्यांनी हसत हसत
याचिकाकर्त्यांना म्हटले की, तुम्ही फक्त लाल किल्ला का मागत आहात? फतेहपूर सिक्री आणि ताजमहाल का नाही मागत? यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, दिल्ली उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळताना मेरीटचा विचार केलेला नव्हता तर याचिका उशीरा दाखल केल्यामुळे फेटाळली होती. सर्वोच्च न्यायालयानेही असाच विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली. यावर न्यायासनाने मेरीटच्या आधारावरच ही याचिका फेटाळली. सरन्यायाधीश म्हणाले की, सदर याचिका चुकीची आणि निरर्थक असल्यामुळे ती विचारात घेतली जाऊ शकत नाही.
नेमके प्रकरण काय ?
१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ब्रिटिशांनी मुघलांकडून लाल किल्ला ताब्यात घेतला. बहादूर शाह जफर दुसरा यांनी वसाहतवादी शासकांविरुद्धच्या बंडाला पाठिंबा दिला म्हणून त्यांना देशाबाहेर काढण्यात आले आणि त्याची जमीन आणि मालमत्ता जप्त करण्यात आली होती. आपण अखेरचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे थेट वंशज आहोत. त्यामुळे लाल किल्ल्यावर आपला मालकी हक्क आहे. सरकारने आपल्या लाल किल्ला देणार नसेल पैसे द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका कोलकाता येथील रहिवासी सुलताना बेगम यांनी केली होती.