दुर्दैवी : साजशृंगार खरेदीसाठी गेला आणि नको ते घडलं, गावात हळहळ

जळगाव :  बैल पोळा सणानिमित्ताने शेतकरी बांधव हे बैलांना साज चढवून सजवीत असतात. याच प्रमाणे एक १६  वर्षीय मुलगा आपल्या बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीकरुन दुचाकीने घरी येत असताना त्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हा मुलगा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता, त्याच्या अशा अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवन गोपाल सुर्यवंशी (वय १६ रा. वसंतवाडी ता. जळगाव )असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.

जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावाचा रहिवाशी पवन गोपाल सुर्यवंशी आपल्या आईवडिलांसह वास्तव्याला होता. तो विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचे आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात. पोळा सणानिमित्त त्यांच्या बैलांची तयारी सुरू होती. त्यामुळे पवन सुर्यवंशी हा बैलांसाठी कासरा व गोंडे घेण्यासाठी गावातील अल्ताफ तडवी यांच्यासोबत सकाळी दुचाकीने वावडदा येथे गेले. बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर सकाळी १० वाजता परत येत असतांना वाडवदा ते जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अल्ताफ हा थोडक्यात बचावला आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे. हा अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन घेवून पसार झाला होता.