नंदुरबार : गेल्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 24 जिल्हे, 103 तालुके या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाली आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमखास मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्री ॲड. कोकाटे हे रविवारी (6 एप्रिल) जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
या वेळी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत. काही ठिकाणी एक-दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्यासमोर येईल. तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
केंद्र सरकारकडे मदत मागणी प्रस्ताव पाठविणार
नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर, आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ,गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे सोमवारी (7 एप्रिल) नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगून मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, हे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून मंत्री ॲड. कोकाटे यांनी त्यांना
शासनाकडून दिलासा देण्याबाबात आश्वस्त केले.