---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सोमवारी (२१ एप्रिल) काढण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील १ हजार १३१ ग्रामपंचायतींपैकी ५८१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यात सर्वाधिक अमळनेर तालुक्यात ६० महिला उमेदवारांना सरपंचपदासाठीची संधी मिळणार आहे.
त्यामुळे अनेक हौसे-नवसे-गवसेच्या सुप्त इच्छांना मुरड घातली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ ते २०३० साठी प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यात १ हजार १३१ सरपंचपदांच्या जागांसाठी सोमवारी (२१ एप्रिल) सोडत काढण्यात येणार आहे. त्यात ५८१ ग्रामपंचायत सरपंचपदसाठीच्या जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे या जागा सोडून जिल्ह्यातील अन्य ग्राम पंचायतींच्या सदस्य, सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
या आरक्षणामुळे अनेक सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांची अडचण होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी अडचण नको म्हणून अनेकांनी त्यांच्या सौभाग्यवतींना संधी मिळावी यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आतापासूनच जात प्रमाणपत्र काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक ग्रामीण महिलांचे राज्य
जिल्ह्यातील सर्वसाधारण, खुल्या प्रवर्गात ६१६ महिला सरपंचांपैकी सर्वात जास्त ६० सरपंचपदे महिलांसाठी अमळनेर तालुक्यात आहेत. तसेच जामनेर ५४, पाचोरा ५२, चाळीसगाव ५८ आणि पारोळा ४३ असे महिला सरपंचपदांसाठी तालुक्यांचे आरक्षण निघाले आहे.
---Advertisement---