टीओडी मीटर बसवलेल्या दीड लाख ग्राहकांना ९५ लाखांची सवलत! घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराचा फायदा; महावितरणतर्फे सहकार्य करण्याचे आवाहन

---Advertisement---

 

जळगाव : १ जुलै २०२५ पासून ‘महावितरण’च्या स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वापरलेल्या विजेवर टीओडी सवलत लागू झाली आहे. टीओडी मीटर बसवलेल्या जळगाव परिमंडळातील एक लाख ६६ हजार घरगुती ग्राहकांना गेल्या चार महिन्यांत ९५ लाखांची सवलत वीजबिलात मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे. त्यामुळे मीटर बसवण्याकामी ग्राहकांनी ‘महावितरण’ आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

‘महावितरण’कडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरात घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीजदरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा १ जुलैपासून सुरू झाला आहे. ‘महावितरण’कडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.

जळगाव परिमंडळात एक लाख ६६ हजार ६९७ घरगुती ग्राहकांना वीजबिलात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत ९४ लाख ८० हजार ३६९ रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. जळगाव मंडळातील ९५ हजार ७८५ ग्राहकांना ५३ लाख ९४ हजार ६८ रुपये, धुळे मंडळातील ४२ हजार ४४८ ग्राहकांना २२ लाख ५७ हजार ४२ रुपये, तर नंदुरबार मंडळातील २८ हजार ४६४ ग्राहकांना १८ लाख २९ हजार २५९ रुपये सवलत मिळाली आहे.

नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे अचूक बिले मिळून घरातील वीजवापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाइलवर पाहता येणार आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

अत्याधुनिक टीओडी वीजमीटर पोस्टपेड

ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. टीओडी मीटर असल्याशिवाय घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापराची सवलत मिळू शकणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने टीओडी मीटर आवश्यकच आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी टीओडी मीटर बसविण्याकामी ‘महावितरण’ आणि संबंधित एजन्सीला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

अशी आहे टीओडीप्रमाणे वीजदर आकारणी

टाइम ऑफ डे प्रणालीनुसार वीजवापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीजदरासाठी टीओडीप्रमाणे आकारणी सुरू झाली आहे. ‘महावितरण’कडून २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टीओडीनुसार स्वस्त वीजदराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---