---Advertisement---
जळगावः निवडणुकांआधी राज्य शासनाने काढलेला जीआर सत्ता येताच बदलल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्याला मिळणाऱ्या वाढीव भरपाईपासून वंचित रहावे लागत आहे. जीआर बदलल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान जानेवारीच्या जीआरप्रमाणेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखिल शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राकाँ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य शासनाने निवडणुकीआधी 1 जानेवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना भरपाईपोटी प्रतिहेक्टरी 13600 जिरायत, 27000 बागायत आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रूपये नुकसान भरपाईचा जीआर काढला होता. यात 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर सत्ता येताच राज्य शासनाने 1 जानेवारी 2024 चा जीआर रद्द करून 30 मे रोजी नवीन जीआर काढला. हा जीआरच शेतकऱ्यांच्या मुळावर उठला. नवीन जीआरमध्ये शेतकऱ्यांना भरपाईपोटी प्रतिहेक्टरी जिरायतसाठी 8500, बागायतसाठी 17000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22500 अशी मदत मंजूर केली आहे. तसेच क्षेत्र देखिल 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंत राहील असे नमूद केले आहे. शासनाचा हा जीआर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारा असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रमोद पपाटील यांनी केला आहे. तसेच शासनाने 1 जानेवारी 2024 च्या जीआरप्रमाणेच भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा जनआंदोलन
निवडणुकीआधी भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या आशेपोटीच शेतकऱ्यांनी भाजपला सत्ता दिली. आता मात्र राज्य सरकार या आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केला. शिवाय थकबाकी असल्य्ााने शेतकऱ्यांना नवीन कर्ज देखिल मिळत नाही. जे कर्ज घेण्यासाठी पात्र आहेत त्यांचा सिबील स्कोर तपासला जात आहे. त्याचे पैसे देखिल शेतकऱ्यांकडून बँका घेत आहेत. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना त्वरीत नव्याने कर्ज द्यावे आणि सिबील स्कोरची अट रद्द करावी अन्यथा शरद पवार गट जनआंदोलन उभारेल असा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष एजाज मलिक, बाधित शेतकरी विकास पवार, महिला अध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, कल्पिता पाटील, संग्रामसिंह पाटील, ॲड. सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाचा जीआर जाळला
पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, बाधित शेतकरी विकास पवार, महानगराध्यक्ष एजाज मलिक, ॲड. सचिन पाटील, अमोल कोल्हे, वाय.एस. महाजन यांनी शासनाचा अन्यायकारक जीआर जाळून निषेध व्यक्त केला.