---Advertisement---
जळगाव : जिल्हयात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाची तूट आगामी दोन दिवसांत भरून निघण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात २५ व २६ जून रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मे महिन्यात जरी चांगला पाऊस झाला असला तरी जून महिन्यात मात्र जिल्ह्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे. जून महिन्यातील सरासरीपेक्षा जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. मात्र, कमी पावसाची ही तूट आगामी दोन दिवसांत भरून निघण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यासाठी २५ व २६ जून या दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट जारी केला आहे. २४ ते २७ जूनदरम्यान जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसासोबतच जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत महिन्याभरातील पावसाची तूट भरून निघेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
---Advertisement---
हतनूरसह शेळगावचे दोन दरवाजे उघडले
गेल्या ४८ तासांत गिरणा धरणातील जलसाठ्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील पावसामुळे हतूनरसह शेळगाव बरेज प्रकल्पातील दोन दरवाजे अर्ध्या मीटरने उघडल्यामुळे तापी नदी खळाळून निघाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला गिरणा धरणातील जलसाठा २१ टक्क्यांवर आला होता. जून मध्यान्हात हा साठा २२ टक्क्यांवर आला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने गिरणा धरणातील साठा २५ टक्क्यांवर गेला आहे.
२५५ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेल्या तापी नदीवरील हतनूर धरणात २२ जूनअखेर १३९.५० दशलक्ष घनमीटर (५४.७१ टक्के) उपयुक्त्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जेमतेम २७.६९ टक्के पाणीसाठा होता. यंदा परिस्थिती चांगली असताना हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात, तसेच मध्य प्रदेशात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्था मीटरने उघडले आहेत.