---Advertisement---
जळगाव : गेल्या तीन चार दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे गिरणा प्रकल्प जलसाठ्यात आतापर्यंत तब्बल १० टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे हतनूरचे १० दरवाजे १ मिटरने उघडून २० हजार २७० क्यूसेक तर शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे ७ दरवाजे दोन मीटरने उघडून ५२ हजार ७६५ क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के मान्सून झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
हतनूरचे १० दरवाजे १ मिटरने उघडले
तापी नदी पाणलोट क्षेत्रातदेखील दमदार पावसामुळे हतनूर प्रकल्पात तब्बल ५०.२९ दलघमी पाण्याची आवक झाली असून ४४.१६ टक्के जलसाठा आहे. पाण्याची आवक पाहता हतनूर प्रकल्पाचे १० दरवाजे उघडून तापी नदीपात्रात २० हजार २७० क्यूसेकचा विसर्ग केला जात आहे. तसेच शेळगाव बॅरेजचे ७दरवाजे २ मिटरने उघडून ५२ हजार ७६५ क्यूसेकचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
प्रकल्प पाणलोट क्षेत्रात सरासरी ४४ मि.मी. पाऊस
जिल्ह्यातील मोठे, लघू तसेच मध्यम पाणलोट क्षेत्रात सरासरी ६०.१४ दशलक्ष घनमिटर पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघू, १४ मध्यम आणि ३ मोठ्या प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गत २४ तासात सरासरी ४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रकल्पांमध्ये १९.३९ टीएमसी उपयुक्त जलसाठा
सद्यस्थितीत जिल्ह्यात वाघूर ६५.२० टक्के, अभोरा ६१.५२, मंगरूळ ३०.५९. सुकी ८९.०१, मोर ६२.७१, गुळ ४९.९३, बहुळा २०.९४, अंजनी ३०.५७, मन्याड १०.४४, शेळगाव १६.९५, तोंडापूर ६.९१ असा सरासरी १९.३९ टीएमसी अर्थात ३५.७१ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
आर्द्राचा मान्सून पोचला ९६ टक्क्यांवर
जिल्ह्यात मे महिन्याचे पर्जन्यमान सरासरी ५ मिलीमीटर आहे. परंतु मे दरम्यान बेमोसमी आणि मान्सूनपूर्व पाऊस सरासरी ७० मि.मी. झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतमशागतीच्या कामांना जोड मिळाली होती. मात्र जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १२३.७ मि.मी असले तरी मृग नक्षत्रात काही प्रमाणात ओढ दिल्याने आतापर्यंत जूनमध्ये सरासरी ११८.७ मिलीमीटरनुसार ९६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
गिरणा प्रकल्पात ९.८५ दलघमी आवक
जून महिन्याच्या सुरुवातीला गिरणा प्रकल्पातील जलसाठा २१ टक्क्यांवर आला होता. जूनच्या दुसऱ्या सप्ताहाच्या अखेर काही प्रमाणात आवक होऊन जलसाठा २२ टक्क्यांवर आला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात चणकापूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ६मि.मी. पावसाची नोंद असून ५४४ क्यूसेकचा विसर्ग होत आहे. तसेच अर्जुनसागर पुनद प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ४ मि.मी पावसाची नोंद असून प्रकल्पाचे ४ गेट उघडून ८८० क्यूसेक तर ठेंगोडा बंधाऱ्यातून रहजार ४६१ क्यूसेक विसर्ग होत आहे. हरणबारी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात ३. केळझर ७ मिलीमीटर असे सरासरी २८ मिलीमीटर पर्जन्यमान असून मध्यम प्रकल्पात सरासरी ३५ टक्के जलसाठा आहे. गिरणा प्रकल्पाच्या वर असलेल्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गिरणा प्रकल्पात टप्प्याटप्प्याने आवक झाली आहे. गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ९.८५ दलघमी पाण्याची आवक झाल्याने सद्यस्थितीत उपयुक्त जलसाठा ३१.२८ टक्क्यांवर पोचला आहे.
तीन प्रकल्पात थेंबभर देखील आवक नाही
भोकरबारी, बोरी आणि अग्नावती हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. गतवर्षी याच दिवशी १३.२६ टीएमसी नुसार २४.४२ टक्के जलसाठा असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे होती.