---Advertisement---
जळगाव : आंघोळीसाठी गेलेल्या आठ मित्रांपैकी एकाचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निंबादेवी धरण येथे रविवारी (२९ जून) रोजी ही घटना घडली असून, या घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे. जतीन अतुल वार्डे (१८, रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील आठ तरुण रविवारी (२९ जून) रोजी निंबादेवी धरणावर आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, आंघोळ करताना खोल पाण्यात गेल्याने जतीनसह एक तरूण बुडत होता. समय सूचकता दाखवत, दुसऱ्याला वाचवण्यात यश आले, मात्र जतीन खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला.
---Advertisement---
याबाबत पोलिस पाटील पंकज बडगुजर यांनी तात्काळ यावल पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार अर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी आणि संतोष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली. मात्र रात्री उशिरापर्यंत तो मिळून न आल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या पावसाळा सुरू आहे. यामुळे निंबादेवी धरणात पाण्याची पातळी कधीही वाढू शकते. नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा यावलचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिला आहे.