---Advertisement---
Jalgaon Weather Update : गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराने राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद करत जणू ‘थंड हवेचे ठिकाण’ अशी नवीन ओळख निर्माण केली आहे. अशात पुन्हा जिल्ह्यात २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जळगावकरांना महिनाभर तरी थंडीचा सामना करावा लागणार आहे.
भारतीय हवामान खाते आणि ममुराबाद वेधशाळेकडील नोंदीनुसार, मंगळवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे जळगाव शहराचे तापमान थेट ९.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. रात्रीच्या तापमानात अचानक झालेल्या या मोठ्या घटीमागे उत्तरेकडून येणारे थंड वारे अजूनही सक्रिय असणे हे प्रमुख कारण आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात २० ते २५ नोव्हेंबरपर्यंत थंडीचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाच थंड शहरे
जळगाव – ९.२ अंश
गोंदिया – १०.४ अंश
नाशिक – १०.८ अंश
बीड – ११.५ अंश
छत्रपती संभाजीनगर – ११.८ अंश
दरम्यान, मंगळवारी ९.२ अंशाची नोंद करण्यात आली असून, यंदाच्या हिवाळी हंगामातील हे सर्वात कमी तापमान ठरले आहे. नोव्हेंबर महिन्यात सहसा जळगावचे किमान सरासरी तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान असते. यापूर्वी २०१७ मध्ये नोव्हेंबर महिन्यात तापमानाचा पारा ९.४ अंशांपर्यंत खाली उतरला होता. त्यानंतर तब्बल ७वर्षांनी, ११ नोव्हेंबर रोजी तापमानाने ९.२ अंशांचा निचांक गाठला.









